पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भक्ती-शक्ती निगडी येथे शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी शिवसह्याद्री शिवस्पर्श प्रतिष्ठान ग्रुप तळेगाव दाभाडे निर्मित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ४०० कलाकार, घोडे, उंट यांचा समावेश असलेले ३ मजली सेटवरील ‘’शिवसह्याद्री’’ हे भव्य महानाट्य संपन्न झाले. या महानाट्याला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दर्शवला. ३ तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या महानाट्यातील कलाकारांचा अभिनय, भव्यदिव्य सेट, आकर्षक अशी विद्युत रोषणाई, पाहून उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले.
या महानाट्यास उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य सचिन चिखले, भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उप आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी उपस्थितांचे आभार मानले तर सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
संभाजीनगर, चिंचवड येथील कार्यक्रमात ‘’छत्रपती शिवाजी महाराज व आजची पिढी’’ या विषयावर व्याख्याते संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी प्रविणदादा गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, एक उत्कृष्ट प्रशासक, लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख होती. त्यांच्या अंगी औदार्य, लोकसंग्रह, नि:पक्षपातीपणा, मित्रभाव, उद्यमशिलता, कल्पकता, तेजस्विता, मातृपितृभक्ती असे अनेक अलौकिक गुण होते. त्यांच्या या गुणांचे तरूण पिढीने अवलोकन करून चांगले समाजकार्य घडविण्याचा निर्धार करायला हवा. या कार्यक्रमास माजी महापौर मंगला कदम, मुख्य लिपीक वसिम कुरेशी उपस्थित होते.
लोकमतचे राज्य संपादक संजय आवटे यांचे संभाजीनगर, चिंचवड येथे ‘असे’ होते छत्रपती शिवाजी महाराज’’ या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आपल्या देशात अनेक राजे होऊन गेले. परंतु त्यांच्या जयंत्या देशभर व देशाबाहेर साजऱ्या होत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे होते ज्यांनी रयतेचे स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवराय सर्वसमावेशक दुरदृष्टी असलेले रयतेच्या कल्याणाचा ध्यास असणारे, न्यायप्रविष्ट शिस्तप्रिय राहून स्वराज्य टिकवणारे राजे होते. छत्रपती शिवराय खऱ्या अर्थाने आरमाराचे जनक होते. छत्रपती शिवरायांच्या खऱ्या गुरू राष्ट्रमाता जिजाऊ होत्या. कमी सैन्यामध्ये बलाढ्य निजामांना शह देऊन किल्ले ताब्यात घेताना शक्तीबरोबर युक्तीचाही वापर छत्रपती शिवरायांना केलेला दिसून येतो. सूत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले.
१७ फेब्रुवारी रोजी डांगे चौक, थेरगाव येथे शिवशाहीर सुरेश सुर्यवंशी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शाहिरी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा संपुर्ण जीवनपट उलगडून सांगितला. यावेळी शिवशाहीर सुरेश सुर्यवंशी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श सगळ्यांनी घेतला तर राज्याचा खऱ्या अर्थाने विकास होण्यास मदत होईल. यावेळी मुख्य लिपिक किसन केंगळे उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाच्या निमित्ताने ‘शिवसह्याद्री’ या महानाट्याचे भक्ती- शक्ती निगडी येथे सलग तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी या महानाट्याला जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवावी व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवावा, असे आवाहन उप आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे.