पुणे (Pclive7.com):- महापालिकांच्या क्षेत्रात रात्री संचारबंदी लागू झाल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरला शहराऐवजी ग्रामीण भागातील फार्म हाऊसवर जाऊन पार्ट्या करण्याचे काहींचे मनसुबे धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड या शहरांत संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत महसूल आणि पोलीस विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते. या बैठकीत चर्चा होऊन काही महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत.
बैठकीबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘महापालिकांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागरिक जाण्याची शक्यता आहे. याबाबत आढावा घेऊन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना केल्या आहेत. तो प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर पुणे ग्रामीण भागात रात्री अकरा ते सकाळी सहा या कालावधीत संचारबंदी लागू होऊ शकेल.’
शहरातील नागरिक हे प्रामुख्याने ३१ डिसेंबरला ग्रामीण भागात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार संचारबंदीबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे’ असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महापालिकांच्या हद्दीत संचारबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी ग्रामीण भागात फार्म हाऊस किंवा अन्य ठिकाणी जाण्याचे नियोजन केले आहे. मात्र, ग्रामीण भागातही संचारबंदी लागू होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या सर्वांचीच कोंडी होणार आहे.