पिंपरी (Pclive7.com):- जीवनात यशस्वी होण्यसाठी चिकाटी अत्यावश्यक आहे. खेळात यशस्वी होण्याचा मार्ग सोपा नसतो. कोणत्याही ध्येयाकडे जाताना वाटेत अनेक अडचणी येतात. काही अडचणी इतक्या मोठ्या व बिकट असतात की आपण गडबडून जातो. काही वेळा तर प्रयत्न अर्धवट सोडून द्यावेत की काय असे वाटते. परंतू अडचणी व संकटाला न घाबरता त्यावर मात करुन पुढे जाणे महत्त्वाचे असते. हा गुण म्हणजेच चिकाटी होय. जगातील सर्व महान लोकांकडे चिकाटी हा गुण होता. चिकाटी असल्याशिवाय जीवनात यशस्वी होऊ शकत नाही असे मत भरत भिल्होरे यांनी यांनी उपस्थित खेळाडू यांना केले.
भोसरीतील आदिनाथ क्रिकेट क्लबचा मैदानावर मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करताना ते बोलत होते. क्रिकेटपटू आशुतोष सिंह यांचे हस्ते मेजर ध्यानचंद यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी आकाश हिरेमठ, योगेश कोडगिरी, सुनील गायकवाड, स्वराज शिंदे, सूरज यादव, विमल कुमार युवा खेळाडू व पालक उपस्थित होते. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय जलतरणपटू तन्मय डोळस, राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू सुमित सावंत, महिला क्रिकेटपटू पृथ्वी भुसारे, श्रेया जगदाळे यांना सन्मानित करण्यात आले.
खेळाडू आशुतोष सिंग म्हणाले की, क्रीडा दिनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस केवळ आनंदोत्सव साजरा करण्यापुरताच मर्यादित नाही, तर देशभरात क्रीडाविषयी भावना अधिक जागृत करणे हा देखील आहे. उदयोन्मुख खेळाडूंना क्रीडा संस्कृती, परंपरा माहीत व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन केले जाते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षक व रणजी खेळाडू विजय जगदाळे यांनी केले, सूत्रसंचालन स्वराज शिंदे यांनी तर आभार योगेश कोडगिरी यांनी मानले.