पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलगीकरणाचा निर्णय घेतला आहे. थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, वाकड, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर या परिसरात प्राधिकरण अस्तित्वात आल्यापासून या भागात नागरिकांनी अर्धा गुंठा, एक गुंठा अशी बांधकामे केली आहेत.
मात्र, या नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
याबाबत संतोष बारणे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेत निवेदन दिले. त्यानुसार, ज्या वेळेस प्राधिकरण होते त्या वेळेस पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाने संबंधित घरांचे सर्वेक्षण केले आहे. या भागातील नागरिकांच्या मिळकती तसेच ७ / १२ वर अजूनही पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे नाव आहे.
त्यामुळे या भागातील नागरिकांना बांधकाम परवानगी असेल किंवा त्यांना बँकेकडून कर्ज घेण्यासंदर्भात अडचणी येत आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांना सूचना द्याव्यात, अशी मागणी बारणे यांनी केली आहे.