पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात आज जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ ‘दिवसाआड’ पाणी पुरवठा सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारे पवना धरण १०० टक्के भरले असतानाही पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपात लादली जात आहे. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने आज (दि.१६) महापालिका भवनात आंदोलन करण्यात आले.
मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रुपेश पटेकर, बाळा दानवले, मयुर चिंचवडे, अश्विनी बांगर, स्नेहल बांगर, राजु सावळे, विशाल मानकरी, सुशांत साळवी, सुरेश संकट, निलेश कांबळे, संजय मोरे, सचिन सोनटक्के, अशोक धोत्रे, नारायन पठारे, विजया परदेशी, नितीन चव्हाण, सुजाता काटे, रवी जाधव, दत्ता देवतरासे, मयुर हजारे, आण्णा कापसे, सुरेश भिसे, काशिनाथ खजुरकर, कृष्षा बिरुणगिकर, सागर शिंदे, साईराम भोसले, के.के. कांबळे, आंनद भाकरे, रमेश उकाडे, आशिष चव्हाण, रोहण कांबळे, निलेश नेटके, विद्याताई कुलकर्णी, रणजित ठाकुर, सीमा बेलापुरकर, श्रद्धा देशमुख, संगिता देशमुख, सचिन मिरपगार, नितिन सुर्यवंशी, अनिता पांचाळ, वैशाली बौत्रे, आकाश सागरे, रवी कोणरकर आदी उपस्थित होते.
या आंदोलनाबाबत बोलताना सचिन चिखले म्हणाले की, तत्कालीन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दि.२५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. परंतु आजतागायत पाणीकपात चालू आहे. प्रशासनाची अडचण समजून शहरातील नागरिकांनी महापालिकेस सहकार्य केले.
मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरलेले असतानासुद्धा प्रशासन नागरिकांचा विचार करीत नाही. नागरिकांची ही अडचण समजून आयुक्त राजेश पाटील यांनी दि. १ नोव्हेंबरपासून शहरात सर्वत्रच टप्पाटप्प्याने नियमित पाणी पुरवठा करावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडे आयुक्तांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. जनतेच्या या मागणीसाठी आज मनसेने आंदोलन केले.
आयुक्त राजेश पाटील यांनी तात्काळ या मागणीचा पुनर्विचार करून शहरवासियांना नियमित पाणी देऊन दिलासा द्यावा. अन्यथा मनसेला पुढील काळात कठोर भुमिका घ्यावी लागेल असा इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे.