:- जीवघेण्या ‘ब्लू व्हेल’ या गेमची लिंक तातडीने हटविण्यात यावेत असे आदेश केंद्र सरकारने गुगल, फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, याहू आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यसभा खासदार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
‘ब्लू व्हेल’ या गेममध्ये देण्यात येणाऱ्या टास्कमुळे देशात अनेक ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या गेमवर बंदी आणण्याची मागणी देशभरातून करण्यात येत होती. राज्यसभा खासदार अमर साबळे यांनीही नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘ब्लू व्हेल’ गेमसंदर्भात प्रश्न उपस्थित करून यातील गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. व या गेमवर देशात तात्काळ बंदी घालण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली होती. त्यांच्या या मागणीला सर्वपक्षीय खासदारांनी जोरदार पाठींबा दर्शविला होता. केंद्र सरकारने खासदार साबळे यांच्या मागणीची गंभीर दखल घेत आणि या गेमच्या संभाव्य धोका ओळखत या गेमवर देशात बंदी घालण्याचे आदेश अखेर दिले आहेत.
यावर बोलताना खासदार साबळे म्हणाले की, केंद्र शासनाच्या ‘ब्लू व्हेल’ गेमवरील बंदीच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या गेममुळे देशातील लहान मुलांच्या आयुष्याला धोका निर्माण झाला होता. दुर्दैवाने या गेममुळे काही जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनांची गंभीर दखल घेत अखेर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून ‘ब्लू व्हेल’ या गेमवर बंदी आणण्याची मागणी मी सभागृहकडे केली. माझ्या मागणीचा विचार करून आणि देशातील लहान मुलांपुढील संभाव्य धोका ओळखून केंद्र शासनाने या गेमवर बंदी घालून या गेमची लिंक हटविण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना दिले. ही अतिशय आनंदाची आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. जगभरातील इतर देशांनीही भारताचा आदर्श घेत ‘ब्लू व्हेल’ सारख्या जीवघेण्या गेमवर बंदी घालावी असे आवाहनही खासदार साबळे यांनी यावेळी केली.