पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यासोबतच काही भागांमध्ये टायर, नारळाच्या करवंट्या, जुनी प्लॅस्टिकची भांडी, कुंड्या आदी टाकाऊ वस्तूंमधून मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे साथीचे आजार वाढले आहेत. या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यापक उपाययोजना करा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2022/07/IMG-20220717-WA0004-300x300.jpg)
याबाबत मारुती भापकर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार, शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना ताप येणे, थंडी वाजून येणे, अंग दुखणे, डोके दुखणे असे आजार वाढले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने यापूर्वी धूर, औषध फवारणी, डबक्यांमध्ये ऑइल टाकणे, गप्पी मासे सोडणे आधी उपाययोजना केल्या जात होत्या. त्यावर महापालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करत होती.
दरवर्षीच्या तरतुदीप्रमाणे यावर्षी देखील आर्थिक तरतूद असताना धूर, औषध फवारणी, डब्यात ऑइल टाकणे, गप्पी मासे सोडणे आदी उपायोजना करताना महापालिका दिसत नाही. त्यामुळे या पुढच्या काळात डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू या आजारांचा फैलाव शहरात अधिक वेगाने होऊ शकतो. संबंधित विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांना सूचना देऊन योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.