(प्रतिनिधी):- पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस यांच्या किंमती रोज वाढत असून महागाईने जनता त्रस्त झाली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला बळीराजा रोज आत्महत्या करीत असताना राज्य सरकार फक्त कागदोपत्री कर्ज माफीची घोषणा करीत आहे. अद्यापही त्यांनी कर्जमाफ झालेल्या शेतक-यांची यादी जाहीर केलेली नाही. जीडीपीचा दर घसरत आहे. निवडणुकीपूर्वी केंद्र व राज्य सरकारने दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरले आहे. जनतेला याचा पश्चाताप होत आहे, अशी टिका खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी येथे केली.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात केंद्र व राज्य सरकारचा वाढत्या महागाईविरोधात निषेध करण्यासाठी शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना शहरप्रमुख व गटनेते राहुल कलाटे, शहर संघटिका सुलभा उबाळे, जिल्हा संघटक सुशिला पवार, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, नगरसेवक अमित गावडे, सचिन भोसले, निलेश बारणे, नगरसेविका रेखा दर्शिले, मीनल यादव, अश्विनी वाघमारे, उपजिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर, माजी नगरसेवक मधुकर बाबर, मारुती भापकर, प्रकाश बाबर, माजी नगरसेविका शारदा बाबर, विजया जाधव, पिंपरी विभाग संघटक योगेश बाबर, पिंपरी विधानसभा समन्वयक रोमी संधू, चिंचवड विधानसभा समन्वयक गजानन चिंचवडे, चिंचवड विभाग संघटक वैशाली मराठे, आशा भालेकर, भोसरी विधानसभा समन्वयक विनायक रणसुभे, शिवव्यापारी सेना शहरप्रमुख युवराज दाखले, कार्यालयीन सचिव ज्ञानेश्वर शिंदे, युवा सेना अधिकारी सचिन सानप, राकेश वाकुर्डे, भोसरी समन्वयक युवराज कोकाटे आदींसह शेकडो शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना शहरप्रमुख गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, फसव्या केंद्र व राज्यसरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून आज राज्यभर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचा आदर्श घालून दिला आहे. मागील तीन वर्षात सर्व आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. कष्ट करून पै-पै जमवून, कर्ज काढून गरजेसाठी दुचाकी वापरणारे देखील आता सरकारच्या दृष्टीने श्रीमंत आहेत. सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, ते ठिकाणावर आणण्यासाठी आणि सामान्य जनतेचा आवाज उठविण्यासाठी, जनतेच्या भावना मांडण्यासाठी शिवसेना नेहमी रस्त्यावर येईल. महागाईने जनतेला वेठीस धरले आहे. सोशल मिडियातुन देखील जनतेचा रोष वाढत आहे. सेनेने कायम जनतेच्या बाजूने लढा उभारला आहे, असेही कलाटे म्हणाले.
शहर संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या की, अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणारे सरकार गरीबांना लुटत आहे. म्हणून आज महागाईच्या महिषासुराचा वध दुर्गेच्या हातून करण्यात येत आहे. सरकार विरोधातील सोशल मिडियातील प्रतिक्रियांना नोटीसा देणे म्हणजे ‘हिटलर शाही’ आहे.
आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार म्हणाले की, शिवसेना सत्ता लोलूप नसून जनतेच्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आंदोलन करते हे आज राज्यभर दाखवून दिले आहे. व्यापा-यांना व सर्वसामान्य नागरिकांना घातक ठरणारे जीएसटी बील या सरकारने नागरिकांवर लादले आहे. त्यामुळे उद्योग व व्यवसाय मंदावला आहे. मागील तीन वर्षात शेकडो शेतक-यांनी आत्महत्या केलेली असूनही सरकार नुसते कर्जमाफीचे आश्वासन देत आहे. दरवर्षी एक कोटी रोजगार निर्माण करू असे आश्वासन दिले होते. नोटाबंदी व जीएसटीमुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन फसवे होते, हे आता जनतेच्या लक्षात आले आहे.