लातूर – ग्रामपंचायत निवडणुकीच्या महिला उमेद्वाराचा प्रचार अभियानादरम्यान स्वतःच्याच चारचाकी वाहनाखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लातूरमधील पानचिंचोली गावाजवळ घडली.
जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आहे. जसजसा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडाणुकांचा प्रचार संपत येतो आहे तसा प्रचार वेगही वाढत आहे. निलंगा तालुक्यातील तुपडी, सोनेसांगवी व दगडवाडी गट ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे. पद्मीनीबाई माधवराव पाटील यादेखील या निवडणुकीत उतरल्या होत्या. त्या दगडवाडी येथील प्रचार संपवून घराकडे परतत असताना नागोबा भोसले यांच्या घरी भेट देण्यासाठी गेल्या. त्यावेळी टाटा सफारी या त्यांच्या गाडीतून उतरून गाडीच्या पाठीमागे जात होत्या. याचवेळी चालकाने त्यांची गाडी अचानक मागे घेतली आणि त्या गाडीखाली चिरडल्या गेल्या. त्यांच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. सध्या गाडीचा चालक फरार असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. ५० वर्षे वयाच्या पद्मीनीबाई ग्रामविकास जनता पॅनलच्या उमेदवार होत्या.