पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडकरांना फसवू नका, दररोज पाणी द्या, पाणीपुरवठा सुरळीत करा, नागरिकांना पुरेसे पाणी द्या, प्रशासनाचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा जोरदार घोषणा देत पाणीपुरवठा दररोज करण्याच्या मागणीसाठी मनसेने आज महापालिका मुख्यालयात आंदोलन केले.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2022/11/500x500-PMC-News-Banner-Marathi-01-1-300x300.jpg)
मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात बाळा दानवले, रुपेश पटेकर, सचिन शिंगाडे, विनोद भंडारी, अंकुश तापकीर, विशाल मानकरी, राजू साळवे, सुशांत साळवी, सुरेश सकट, नितीन चव्हाण, शिवकुमार लोखंडे, जितेंद्र वाल्हेकर, आकाश पांचाळ, गणेश भोंडवे, अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, संगीता देशमुख, श्रद्धा देशमुख, अनिता पाटील सहभागी झाले होते.
सचिन चिखले म्हणाले, मागील ३ वर्षांपासून पिंपरी- चिंचवड शहरातील नागरीकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांमध्ये मोठे नैराश्य आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरातील नागरीकांना दररोज पाणीपुरवठा करावा. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल.
दरम्यान, तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तांत्रिक कारणे देत २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. त्यावेळी शहरवासीयांना केवळ सहा महिने हा त्रास असेल, त्यांनतर नियमित पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. आज जवळपास तीन वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठ्याची टांगती तलवार शहरवासीयांच्या मानगुटीवर बसलेली आहे. पवना धरणात मुबलक पाणीसाठा असून २४ तास पाणीपुरवठा केला जात नाही. नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. अपुरा पाणीपुरवठा होत आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ मनसेने आंदोलन केले. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.