पिंपरी (Pclive7.com):- चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये गुणवत्तेच्या जोरावर नक्कीच कामे मिळतात. त्यासाठी कोणत्याही चुकीच्या गोष्टी करण्याची आवश्यकता नसते, असे स्पष्ट मत हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने गुरूवारी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले.

गुडीपाडव्याच्या महुर्तावर (२२ मार्च) फुलराणी हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने दिशा सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने आकुर्डी व चिंचवड येथील आयोजित कार्यक्रमात प्रियदर्शनी हिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दिग्दर्शक विश्वास जोशी, माजी महापौर अपर्णा डोके, दिशाचे अध्यक्ष जगन्नाथ (नाना) शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, सचिन साठे, अविनाश ववले, एनआयबीआरच्या प्राचार्या मृदुला गायकवाड, ब्लॉसम शाळेच्या प्राचार्या शारदा भूषण आदी उपस्थित होते.

प्रियदर्शनी म्हणाली की, आपल्या मनात नाकारले जाण्याची (रिजेक्शन) भीती असता कामा नये. गुणवत्ता असलीच पाहिजे व त्यासोबत आत्मविश्वासही असला पाहिजे. तुमच्यातील विश्वास दिसला की गुणवत्ताही दिसून येते. चित्रपटसृष्टीतील वाईट अनुभवांविषयी अनेकदा बोलले जाते. पण प्रत्यक्षात मला असा कोणताही अनुभव आला नाही. आपल्या हातात असते की आपण कोणती भूमिका घ्यायची. गुणवत्तेच्या जीवावर कामे मिळतात. तुमच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवणारी मंडळी आहेत. अभिनयाच्या जोरावर ऑडिशनमधून निवड झालेली ही फुलराणी त्याचे उत्तम उदाहरण आहे, याकडे प्रियदर्शनीने लक्ष वेधले.

मुंबई शहर सुरक्षित आहे, काळजी घेते. कधीच एकटे वाटू देत नाही. मुंबई शहराने आत्मविश्वास दिला. अनुभवातून असे लक्षात आले, की आपण जितके घाबरतो, तितके आपल्याला घाबरवले जाते. आपल्यात धमक असल्यास कोणी काहीही करू शकत नाही, असे तिने ठामपणे सांगितले.
अफलातून ते फुलराणीपर्यंतचा आपला आतापर्यंतचा प्रवास उलगडताना प्रियदर्शनी हिने सांगितले की, माझा जन्म सांगलीचा आहे. बाकी तशी मी संपूर्णपणे पुणेकर आहे. लहानपणी अफलातून नावाच्या टीव्ही शो मधून सुरूवात झाली. त्यात मी स्टँड अप कॉमेडी करून दाखवली होती. अनपेक्षितपणे त्याची मी विजेती ठरले होते. त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात (एन.एस.डी) प्रवेश मिळावा, यासाठी मी सहा वर्षे तयारी केली. मात्र ते स्वप्न काही पूर्ण होऊ शकले नाही. तेव्हा खूप वाईट वाटले होते. आपल्यात काय कमी आहे, असा प्रश्न सतत मनात येत होता.
हास्यजत्रा तेव्हा नुकतेच सुरू झाले होते. गणेश सागडे यांनी हास्यजत्रेसाठी नाव सुचवले. तेव्हा वय लहान होते म्हणून निवड झाली नाही. पण त्याच ऑडिशनमुळे मग काही नाटकांचे प्रयोग केले. निखील रत्नपारखी, भार्गवी चिरमुले, नंदिता पाटकर आदींशी तेव्हा ओळख झाली. त्यांचे खूपच सहकार्य लाभले. मुंबईत पदार्पण झाले. मात्र सुरूवातीला मुंबई-पुणे येऊन जाऊन करत होते. सुदैवाने संघर्षाचा फार कठीण काळ अनुभवावा लागला नाही. अनेक चांगली लोकं भेटली. हास्यजत्रेचा प्रवास सुरू झाल्यानंतर काही चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या. थिएटर सुरूच होते. २०२१ मध्ये फुलराणी सिनेमासाठी ऑडिशन दिले. मात्र, करोना संकट काळ सुरू झाला, टाळेबंदी लागू झाली.
फुलराणीसाठी हास्यजत्रेतून तसेच मालिकेतून गॅप घेतला होता आणि सिनेमाही थांबला होता. अतिशय कठीण परिस्थिती होती. आता काय करायचे, असा प्रश्न होता. पुण्यात निघून आले. बराच काळ घरी होते. मात्र मला आत्मविश्वास होता. परिस्थिती निवळल्यानंतर फुलराणीचे चित्रीकरण पूर्ण झाले. अखेर २२ मार्चला गुडीपाडव्याला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. फुलराणीत शेवंता तांडेल ही मुख्य भूमिका मी साकारत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळेल, अशी आशा प्रियदर्शनीने व्यक्त केली.
अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. नाना शिवले यांनी प्रास्ताविक केले. संतोष बाबर यांनी आभार मानले.