खासदार बारणे यांनी पिंजून काढला पनवेलचा ग्रामीण भाग
पनवेल (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशात विकास पर्व आणले नाही तर भारतीय संस्कृती जपण्याचे व जोपासण्याचे कामही केले आहे. त्यामुळेच संपूर्ण जगात भारताची मान उंचावली आहे. आश्वासनांऐवजी कृतीवर भर असल्याने मोदी यांनी समस्त भारतीयांचा विश्वास जिंकला आहे, असे उद्गार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (गुरुवारी) काढले.
खासदार बारणे यांनी आज प्रचार दौऱ्यात पनवेलचा ग्रामीण भाग पिंजून काढला. या दौऱ्यात वाजे येथे झालेल्या चौक सभेत बारणे बोलत होते. या दौऱ्यात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे, मनसेचे तालुका सचिव दिनेश मांडवकर तसेच प्रथमेश सोमण, सुरेश भोपे, सूरज पालकर, अक्षय म्हसकर, विकास नागे, भरत वाघ, बबन वाघ, सूरज करणूक, एकनाथ देसेकर, प्रल्हाद केणी, रामदास पाटील, दर्शन ठाकूर, भूपेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, विद्याधर चोरगे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
खासदार बारणे म्हणाले की, सुमारे 500 वर्षे जुना वाद निकाली काढत नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराची उभारणी करून जनभावनेला मूर्त स्वरूप देण्याचे काम केले. केवळ अयोध्याच नाही तर देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा त्यांनी विकास केला. त्या माध्यमातून त्यांनी संस्कृती जपण्याचे व जोपासण्याचे कामही केले.
केंद्रात व राज्यात एकाच विचाराचे सरकार असणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार विविध लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झटत आहे. गेल्या पाच वर्षातील पहिली अडीच वर्षे सत्तेत असूनही विरोधी पक्षात असल्यासारखे वाटत होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून लोकांसाठी खूप काही करता आल्याचे समाधान आहे, असे बारणे म्हणाले.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, खासदार बारणे यांनी गेल्या दहा वर्षात विकास कामांसाठी प्रचंड पाठपुरावा करून पनवेल तालुक्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरोघर गॅस सिलेंडर, शौचालये, पिण्याचे पाणी दिले. देशात कुणीही उपाशी राहू नये यासाठी गोरगरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. गरिबांची कदर करणारा हा पंतप्रधान आहे. महिलांना व शेतकऱ्यांना त्यांनी सन्मान दिला आहे. कोरोना काळात मोफत लस पुरवून तुम्ही आम्हाला त्यांनी जीवदान दिले आहे. तुमच्या आमच्या हिताचा विचार करणारे हे सरकार आहे.
काँग्रेसने केवळ आश्वासने दिली तर शेतकरी कामगार पक्षाने वर्षांनुवर्षे मतदारांची केवळ फसवणूक केली, असा आरोपही आमदार ठाकूर यांनी यावेळी केला.
खासदार बारणे यांच्या विजयामध्ये पनवेलचा वाटा सिंहाचा असला पाहिजे, अशी अपेक्षा बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. पनवेल मतदारसंघातून बारणे यांना किमान एक लाखाचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास अरुण भगत यांनी व्यक्त केला.
खासदार बारणे यांनी शेडुंग, बेलवली, लोणीवली, वांगणी, आंबिवली, नेरे, वाजे, शिवणसई, दुंदरे, रिटघर, वाकडी, खानाव, मोरबे, महालुंगी, चिंधण, पालेखुर्द, वावंजे आदी गावांचा प्रचार दौरा केला. फटाके वाजवून, पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. औक्षण करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
























Join Our Whatsapp Group