
खासदार श्रीरंग बारणे यांचा सवाल; १५ टक्के पाणी कपात तत्काळ रद्द करा
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे मावळातील पवना धरण १०० टक्के भरले असून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदी दुथडी भरून वाहत असताना १५ टक्के पाणी कपात कायम कशासाठी ठेवली आहे?, असा सवाल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. ही पाणी कपात तत्काळ रद्द करण्याची सूचना खासदार बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार सुरू आहे. पवना धरण १०० टक्के भरले असतानाही नागरिकांना वेठीस धरले जात आहे. १५ टक्के पाणी कपात कायम ठेऊन नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा घेण्यास भाग पाडले जात आहे. यातून टँकर लॉबीला पोसण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे. शहरात अतिशय कमी दाबाने, अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अनेक सोसायट्याना आजही टँकरने पाणी घ्यावे लागत आहे. सोसायटी धारकांचा टॅंकरवर लाखो रुपयांचा खर्च होत असून आर्थिक भार सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून ३० ते ३५ टक्के पाणी गळती होत आहे. स्मार्ट मीटर बसविले, स्काडा प्रणाली आणली. अमृत योजनेअंतर्गत पाइपलाइन बदली. शहरातील अनेक भागात नवीन पाइपलाइन टाकली. त्यानंतरही पाणी गळती, टँकर लॉबी रोखण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे.

पवना धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. रावेत बंधाऱ्यातून पूर्ण क्षमतेने पाणी उचलले जात आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाने स्वतःच्या चुका झाकण्यासाठी १५ टक्के पाणी कपात कायम ठेवली आहे. ही कपात नेमकी कशासाठी कायम ठेवली आहे, याचा शोध लावावा लागेल. धरणात, नदीत पाणी आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी तातडीने १५ टक्के पाणी कपात रद्द करावी. नागरिकांना मुबलक पाणी द्यावे, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.




















Join Our Whatsapp Group