पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, गोवामुक्तीचा संग्राम, सामाजिक विषमतेविरुद्धची लढाई अशा प्रत्येक संघर्षात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सक्रिय भूमिका बजावली. त्यामुळे महाराष्ट्रात वैचारिक, सामाजिक, साहित्यिक क्रांती घडवण्याचं मोठं श्रेय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाच असल्याची भावना माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी व्यक्त केली आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230713-WA0023-300x150.jpg)
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५४ व्या स्मृतिदिनानिमित्त माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या रहाटणी येथील जनसंपर्क कार्यालयात अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आनंद बुद्ध विहारचे अध्यक्ष महादेव कांबळे, प्रमोद शिंदे, रवी कांबळे, संजय भोसले यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी अभिवादन करताना त्रिभुवन म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मानवतावादी लेखक होते. समाजातल्या दुर्बल, वंचित, पीडित, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव त्यांनी साहित्यातून समोर आणलं. त्यातून उपेक्षित समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यातून मानवतावादाचा, शोषणमुक्तीचा लढा जीवनभर लढला.
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नव्हे तर श्रमिक, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. अशा शब्दांत देशातीलच नव्हे तर जगातील कष्टकऱ्यांच्या श्रमाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे युगप्रवर्तक साहित्य सम्राट होते, असे बाबासाहेब त्रिभुवन यावेळी म्हणाले.