पिंपरी (Pclive7.com):- निगडीतील भुयारी मार्गात टवाळखोर दिवसा ढवळ्या दारू पिण्यासाठी बसतात. रात्रीच्या वेळेस येथे दारू पिणा-यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे भुयारी मार्गाच्या ठिकाणी दोन सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे केली आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, निगडी मधील मुंबई-पुणे हायवे वरील नवीन झालेल्या भुयारी मार्गाचे नुकतेच उद्घाटन होऊन तो रस्ता नागरिकांसाठी खूला करण्यात आलेला आहे. या भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूस मिळून एकूण 8 शाळा आहेत. तसेच नागरिकांना हायवे ओलांडून पलीकडे जाणे धोकादायक होते.
म्हणून हा भुयारी मार्ग बांधण्यात आला. परंतु, या भुयारी मार्गामध्ये आता नको त्या गोष्टी होण्यास सुरुवात झालेली आहे. जवळच असलेल्या झोपडपट्टीमधील टवाळखोर पोर दिवसा ढवळ्या तिथे दारू पिण्यास बसतात. रात्रीच्या वेळेस या दारू पिणा-यांचे प्रमाण वाढते. तसेच बऱ्याच वेळेस यथे मोठ्या प्रमणात कचरा टाकलेला आढळून आलेला आहे. या रस्त्याचा वापर हा सर्व नागरिक तसेच महिला करत असतात.
पण, आता महिलांना हा भुयारी मार्ग धोक्याचा वाटू लागला आहे. या ठिकाणी जर काही गैरवर्तणुकीचा प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता भुयारी मार्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा रक्षक मिळावे जेणेकरून इथे होत असलेले गैर कामाला आळा बसेल.