मुंबई (Pclive7.com):- विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. एकूण १२ उमेदवार रिंगणात असल्याने मतफुटीचा धोका असून, पराभूत कोण होणार याचा अंदाज बांधला जात आहे. बहुतेक पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले असून, पसंतीक्रमानुसार मतदान कसे करायचे याची रणनीती गुरुवारी दिवसभर आखण्यात येत होती. तसेच शुक्रवारी मतदानपूर्वी याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240710-WA0006-300x300.jpg)
सकाळी ९ ते ४ या वेळेत विधान भवन परिसरात मतदान होईल, पाच वाजता मतमोजणी केली जाईल. विधान परिषदेतील ११ सदस्य २७ जुलै रोजी निवृत्त झाले. त्यासाठी हे मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकीला केवळ तीन महिने असताना महायुती तसेच महाविकास आघाडीत यानिमित्त संघर्ष होत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस आमदारांसाठी गुरुवारी रात्री हॉटेलमध्ये स्नेहभोजन ठेवले होते. काँग्रेसने आमदारांना पक्षादेश (व्हीप) जारी केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणे बंधनकारक असल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240703-WA0026-300x200.jpg)
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही मध्य मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पक्षाच्या आमदारांशी चर्चा केली. यावेळी स्नेहभोजनाला पक्षाचे ११ आमदार उपस्थित होते. उर्वरित चार सदस्य नंतर या आमदारांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमध्ये येतील असे एका नेत्याने स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार विमानतळानजिक एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. तर शिंदे गटाचे आमदार वांद्रे येथील हॉटेलमध्ये आहेत. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बुधवारी विधान भवन परिसरात झाल्यानंतर हे आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल झाले.
काँग्रेस पक्षाकडे त्यांचा उमेदवार विजयी झाल्यानंतर अतिरिक्त मते आहे. अन्य कोणाकडेच त्यांनी उभ्या केलेल्या उमेदवारांना स्वबळावर निवडून आणण्याइतके बळ नाही. त्यामुळे मतफुटीचा धोका आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिंदे गट तसेच अजित पवार गटातील काही आमदारांची मते फुटतील असा अंदाज मविआच्या गोटातून व्यक्त केला जात आहे.
विधानसभेतील सध्याचे बलाबल
भाजप १०३, शिवसेना शिंदे गट ३८, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ४२, काँग्रेस ३७, शिवसेना उद्धव ठाकरे गट १५, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १०, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष, एमआयएम, प्रहार जनशक्ती प्रत्येकी २, स्वाभीमानी पक्ष, जनसुराज्य शक्ती, मनसे, माकप, राष्ट्रीय समाज पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष प्रत्येकी १ याखेरीज १३ अपक्ष आमदार आहेत.
●विधानसभेतील २८८ जागांपैकी १४ जागा रिक्त असल्याने सध्या २७४ सदस्य आहेत.
●प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी प्रथम पसंतीची २३ मते आवश्यक आहेत.
●भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत. तर शिंदे गट, अजित पवार गट यांचे प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात आहेत.
●काँग्रेस एक, ठाकरे गट एक उमेदवार तसेच शरद पवार गटाने उमेदवार उभा न करता शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
Tags: विधान परिषद निवडणूक