पिंपरी (Pclive7.com):- पुणे-मुंबई महामार्गावरील ताथवडे गावातील ‘अंडरपास’ अत्यंत धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच, ‘अंडरपास’मध्ये खड्डे पडले आहेत. परिणामी, हा रस्ता जीवघेणा बनला आहे. मात्र, महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते संदीप पवार यांच्याकडे स्थानिक नागरिक आणि पालकांनी अंडरपासच्या समस्येबाबत गाऱ्हाणे मांडले. वारंवार मागणी करुनही ही समस्या सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता स्थानिक नागरिकांच्या साथीने आम्ही आंदोलनात्मक पवित्रा घेणार असल्याचा इशारा संदीप पवार यांनी दिला आहे.
ताथवडे आणि परिसरात ‘हिंजवडी आयटी पार्क’, जेएसपीएम कॉलेज, इंदिरा कॉलेज, डी.वाय.पाटील कॉलेज, अक्षरा इंटरनॅशनल स्कूल यासह अनेक कंपनी आणि संस्थांची कार्यालये या परिसरात आहेत. परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते. परंतु, ताथवडे येथील अंडरपासमध्ये थोडा पाऊस झाला तरी भरपूर पाणी साचलेले असते. शिवाय, या पुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पाण्यामुळे या खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे या परिसरातील कॉलेज आणि शाळेतील विद्यार्थी, पालक यांना रोज अपघाताला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही वाढली आहे.
विद्यार्थी-पालक वाहतूक कोंडीमुळे हैराण…
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणच्या विभागीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. त्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे, असेही संदीप पवार यांनी सांगीतले. दरम्यान, ताथवडे येथील अंडरपासमध्ये दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीला शाळा कॉलेजचे विद्यार्थी, पालक, परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. या पुलाच्या खालचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी होत आहे, २ दिवसांत काम झाले नाही तर पालक आणि नागरिकांनी पुणे- मुंबई हायवे वरती रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
…तर वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल!
संदीप पवार म्हणाले की, पुणे-मुंबई महामार्गावर ताथवडे आणि पुनवळेतील ‘अंडरपास’ची उंची कमी झाल्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचते. त्यातच आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे पुनावळेतील समस्या काही अंशी कमी झाली आहे. मात्र, ताथवडे येथील अंडरपासची समस्या गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी हिंजवडी आयटी पार्क येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विकाभागने वाकड-हिंजवडी परिसरात चक्राकार वाहतूक व्यवस्था केली. त्याचा चांगला परिणाम होत आहे. त्याला जोडून ताथवडे आणि पुनवळेतील ‘अंडरपास’ उंची वाढवण्यात यावी. यामार्गाने वाहतूक झाल्यास आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. याबाबत आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत.