पिंपरी (Pclive7.com):- मुंबई, पुणे येथील यशस्वी परिषदांच्या आयोजनानंतर आता चिंचवडमध्ये ‘ईव्हीएम’ विरोधात आवाज उठवला जाणार आहे. त्यासाठी येत्या मंगळवारी (दि.१६) परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये शहरातील विविध पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात सायंकाळी ५ वाजता ही परिषद होणार आहे.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत राजन खान हे असणार आहेत. परिषदेला आयटी डेटा व ईव्हीएम तज्ज्ञ डॉ. अनुपम सराफ, आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक धनंजय शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर, संविधान व कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे हे या संदर्भातील कायदे विषयक बाब समजावून सांगणार आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, मानव कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, काशिनाथ नखाते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, २०१९ मध्ये कोणत्याही प्रकारची दृश्य-अदृश्य लाटा नसताना पूर्वीपेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या. हा नुसता चमत्कारच नाही. तर, अगदी ठरवून झालेली घटना आहे. याला ‘ईव्हीएम’चा वापर जबाबदार आहे. यामुळे अनेकांचा आता या देशातील निवडणुकांवरचा विश्वास उडायला सुरूवात झाली आहे. भाजपची आता हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे. ‘ईव्हीएम’द्वारे इथून पुढे निवडणुका नकोत. नाहीतर आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार घालू, असे पत्रकात म्हटले आहे. परिषदेच्या आयोजनात डॉ.सुरेश बेरी, क्षितीज यामिनी शाम, प्रकाश पठारे, अॅड. मिलिंद ओव्हाळ यांनी पुढाकार घेतला आहे.