
पिंपरी (Pclive7.com):- मोशी येथील दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत महापौर रवि लांडगे यांनी माणुसकीचा हात पुढे केला आहे. यंदाचा वाढदिवस कोणत्याही प्रकारे उत्साहात अथवा जल्लोषात साजरा न करण्याचा निर्णय घेत त्यांनी कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपये याप्रमाणे एकूण ९ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली.

मोशी येथील दुर्घटनेने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर हादरले असून अनेक कुटुंबांचे आधार हिरावले गेले आहेत. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यापेक्षा संकटग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका महापौर रवि लांडगे यांनी घेतली.

कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्घटनेतील मृत भावेश वाणी, अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजीत पाटील, राहुल गायकवाड आणि वामन कसबे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान मृतांच्या नातेवाईकांकडे मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका योगिता नागरगोजे तसेच राहुल लांडगे यांच्यासह संबंधित कुटुंबीय उपस्थित होते.
मोशी दुर्घटनेत आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलेल्या कुटुंबीयांचे दुःख कोणत्याही आर्थिक मदतीने भरून निघू शकत नाही. मात्र, संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मानसिक आणि आर्थिक आधार देणे ही समाज म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ही मदत करण्यात आली असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.

“दुःखात असलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे, हाच माझ्यासाठी वाढदिवसाचा खरा अर्थ” – महापौर रवि लांडगे
महापौर रवि लांडगे म्हणाले, “वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो; मात्र आपल्या शहरातील नऊ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना वाढदिवसाचा जल्लोष करणे मनाला पटणारे नाही. आपल्या माणसांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हाच माझ्यासाठी वाढदिवसाचा खरा अर्थ आहे. आर्थिक मदतीने त्यांच्या प्रिय व्यक्तीची उणीव कधीही भरून निघणार नाही; मात्र ‘या कठीण काळात तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत’, हा विश्वास त्यांना देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.”

कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू, वंचित आणि संकटग्रस्त नागरिकांना यापुढेही शक्य ती मदत करण्याचे कार्य सुरू राहणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
वाढदिवसाचा आनंद काही क्षणांचा असतो; मात्र एखाद्या कुटुंबाच्या दुःखाच्या काळात दिलेला आधार आयुष्यभर स्मरणात राहतो. दुःखात सहभागी होणे, माणुसकी जपणे आणि संकटात असलेल्या आपल्या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हाच यंदाच्या वाढदिवसाचा संकल्प असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले.






















Join Our Whatsapp Group