पिंपरी (Pclive7.com):- देहू आणि आसपासच्या परिसरात रेडझोनच्या प्रश्नामुळे स्थानिक भूमिपुत्र शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. तसेच नागरी जीवन विस्कळीत झाले आहे. यासंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्र्यांशी चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी देहू येथे दिले.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पादुकास्थान ट्रस्ट यांच्या वतीने काकड आरती महोत्सव आणि अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ट्रस्टच्या वतीने देहूगाव-विठ्ठलवाडी या परिसरात या तीर्थक्षेत्री भेट देणाऱ्या वारकरी भक्तांसाठी भक्तनिवास उभारण्यात आले आहे. या भक्तनिवासाचे उद्घाटन राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून करण्यात आले. याप्रसंगी मावळचे आमदार बाळा भेगडे, पंचायत समिती सभापती गुलाब म्हाळसकर, उपसरपंच संतोष हगवणे, हेमलता काळोखे, बाळासाहेब काळोखे, सखाराम नखाते, तळवडे गावचे माजी सरपंच चिंतामणी भालेकर, उद्योजक गणपत जाचक, ग्रामस्थ व वारकरी संप्रदायाचे अनेक मंडळी उपस्थित होते.
यावेळी लोकप्रतिनिधींनी स्थानिक नागरिकांना सामना कराव्या लागणाऱ्या रेडझोन, खंडाची जमीन, रखडलेली विकासकामे यासारख्या समस्या खासदार साबळे यांच्यासमोर मांडल्या.
त्यासंदर्भात बोलताना खासदार साबळे म्हणाले की, देहू आणि परिसरामध्ये अनेक वर्षांपासून रेडझोनचा प्रश्न प्रलंबित आहे. हा परिसर संरक्षण मंत्रालयाशी संबंधित असल्यामुळे संवेदनशील आहे. यासंदर्भात मी स्वतः माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना शहरात आणून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते. व या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. नवीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्याशीही या प्रश्नावर चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या खंडाच्या जागेवर शेतकऱ्यांना शेती करण्यास मनाई करण्यात आले आहे. मात्र संरक्षण मंत्रालयाकडून जोपर्यंत ही खंडाची जागा वापरात येत नाही तोपर्यंत स्थानिक भूमिपुत्रांना त्या जागेवर कसण्याची परवानगी द्यावी ही विनंतीही आपण संरक्षणमंत्र्यांकडे करणार असल्याचे खासदार साबळे यांनी सांगितले.
देशाचे संरक्षण खाते सक्षम होणे गरजेचे आहे मात्र त्याचबरोबर परिसरातील नागरी जीवन सुखी आणि सुरक्षित राहणे महत्वाचे आहे. या दोन्हींची सांगड घालून आधुनिक नियमानुसार रेडझोनची सीमारेषा कमी करता येईल का याची चाचपणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.