पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला ट्राफिक वार्डनची नेमणूक करण्यात आलेली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये हा यामागील उद्देश असायला हवा होता. परंतु शहरामध्ये सद्यस्थितीला ट्राफिक वार्डन वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा नागरिकांचा छळ करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. या ट्राफिक वार्डनची अरेरावी थांबवा अशी मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. वाघेरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.
याबाबत माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, शहरातील विविध भागांमध्ये सिग्नलवर उभ्या असणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तपासणे, पी.यु.सी. चेक करणे, गाडीच्या काचांवरील फिल्म चेक करणे, सीट बेल्ट लावला नाही. तसेच इतर कागदपत्रांची मागणी करणे, या ना त्या कारणाने वाहनचालकांना वेठीस धरून दंडाची पावती करण्यास भाग पाडले जात आहे. हि तपासणी वाहतूक पोलीस करीत नसून ट्राफिक वार्डन करीत असल्याची तक्रार अनेक नागरिकांकडून केली जात आहे. अनेकदा चालत्या वाहनांना अडवून हा प्रकार केला जात आहे. यामुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवालही नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
शहरातील शगुन चौक, कोकणे चौक, वाकड ब्रिज, फिनोलेक्स चौक, खंडोबा माळ चौक, के.एस.बी. चौक, भोसरी चौक अश्या अनेक ठिकाणी हे प्रकार राजरोसपणे घडताना दिसून येत आहे. शगुन चौक व वाकड ब्रीज् येथे अनेकदा ट्राफिक वार्डन दबा धरून बसल्यासारखे उभे असतात. एखादे वाहन पुलावरून आले कि लगेच त्याला अडवले जाते. वाहनचालकाने कागदपत्रे दाखवण्यास टाळाटाळ केल्यास अथवा तुझा काय संबध कशी विचारणा केल्यास थेट त्यांच्या वाहनाची चावी काढली जाते. एखाद्या वाहनाला किती दंड आकारायचा हे सुद्धा ट्राफिक वार्डनच ठरविताना दिसून येतात. असे प्रकार नित्याचेच झाले आहे. त्यामुळे अशा ट्राफिक वार्डनची अरेरावी थांववून अश्या कामचुकार ट्राफिक वार्डन वर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी संदीप वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.