पुणे (Pclive7.com):- संस्कार भारती ही एक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी अखिल भारतीय संघटना आहे. राष्ट्रीयत्वाची भावना रुजविणे, आपल्या प्राचीन आणि पारंपरिक कलांचे संवर्धन आणि जतन करणे, चारित्र्य संपन्न आणि सशक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, नव्या व होतकरू कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी, साहित्य आणि ललित कला यांच्या माध्यमातून संस्कार भारती देशभर कार्यरत आहे.संस्थेची स्थापना १९८१ साली झाली. आज अनेक मान्यवर कलाकार, चित्रकार, शिल्पकार, नृत्य कलावंत, रंगावलीकार, गायक, वादक, साहित्यिक, दिग्दर्शक, लोककला कलावंत, विचारवंत व कार्यकर्ते या संस्थेशी जोडले गेले आहेत.
या संघटनेच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १ आणि २ ऑक्टोबर २०२३ रोजी यंदा पुण्यात तालेरा गार्डन, मार्केट यार्ड येथे संपन्न होणार आहे. यासाठी देशभरातून विविध प्रांतातील अपेक्षित २५०सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे उद्घाटन, प्रसिद्ध चित्रकार व संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष वासुदेव कामत यांच्या उपस्थितीत आणि किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या हस्ते होणार आहे.
या सर्वसाधारण सभेत देशभर कार्यरत समित्यांचा वर्षभरातील कामाचा आढावा,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त झालेले कार्यक्रम,नागपूरला नुकताच पार पडलेला अखिल भारतीय नाट्यमहोत्सव,तसेच आगामी कलासाधक संगम नियोजन व विशेष कार्यक्रम यावर विचार विनिमय होणार आहे. या निमित्ताने फक्त निमंत्रितांसाठी दिनांक १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मुक्तांगण इंग्लिश स्कूल सभागृहात ‘राष्ट्रजीवन की भागीरथी’ हा संघ गीतांवरील नृत्यावर आधारित कार्यक्रम सादर होणार आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संस्कार भारतीचे अध्यक्ष प्रसिद्ध सतार वादक माननीय उस्ताद उमान खाँ, पुणे महानगरचे अध्यक्ष प्रसिद्ध व्हायोलिन वादक मा. पंडित अतुल कुमार उपाध्ये हेही उपस्थित राहतील. अशी माहिती प्रचार प्रसिद्धी विभागाच्या डॉ. नयना कासखेडीकर यांनी दिली आहे.