पिंपरी (Pclive7.com):- ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, ही भावना सर्वांच्या मनात जागृत राहणे ही काळाची गरज आहे. तसेच समाजावर येणाऱ्या प्रत्येक राष्ट्रीय आपत्तीवर समाजातील प्रत्येक घटकांनी धावून गेले पाहिजे असे उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी केरळ पुरग्रस्तानच्या मदत निधी अर्पण कार्यक्रमात आपले मत मांडले.
उन्नती सोशल फाऊंडेशन व यशदा ग्रुप पिंपळे सौदागर तसेच परिसरातील नागरिकांच्या वतीने केरळ पुरग्रस्तानसाठी १ लाख रूपयांचा धनादेश माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्याकडे देण्यात आला. शहरातील नागरिकांनीही केरळ पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन यावेळी फाऊंडेशनच्या करण्यात आले.
यावेळी नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, हभप चिन्मय महाराज सातारकर, उद्योजक विजय भिसे, हभप भगवती महाराज सातारकर, प्रियदर्शनी सातारकर, हभप अंकुश राजवाडे,हभप शांताराम निम्हण, संस्थापक संजय भिसे, पीके स्कुलचे संस्थापक जगन्नाथ काटे, उद्योजक वसंत काटे, राजू भिसे, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, हेमंत पांचाळ, अर्चना भालेराव, सुषमा सुतार, आनंदा काटे, शंकर चोंधे, विकास काटे यांच्यासह परिसरातील सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थापक संजय भिसे म्हणाले, केरळमध्ये मन हेलावून टाकणारे संकट आले. तेथील अनेक नागरिक मृत्यूमुखी पडले, तर लाखो नागरिक बेघर झालेत. त्यांना मायेचा हात देण्याची आपली जवाबदारी आहे. त्यामुळे समाजातील तळागाळातील नागरिकांनी माणुसकीच्या भावनेतून मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण ज्या परिसरात समाजात राहतो, वावरतो त्यासमाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने देशातील नागरिकांनी वागले पाहिजे. संकट काळात आपल्याकडून कोणाला मदत करता अाली तर जरूर करावी असे आवाहन यावेळी संजय भिसे यांनी केले.