पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे रावेत जलउपसा केंद्राजवळ रोज समाजकंटक टाकत आहेत. जनावरांची चरबी तसेच मृत जनावरे नदीत टाकल्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. म्हणूनच या समाजकंटकांवर कडक कारवाई करा अन्यथा थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे राहुल सरवदे, अनिकेत प्रभु, प्रकाश गायकवाड, गणेश डांगे उपस्थित होते.
थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. यात म्हटलय की, आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी पवना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणीउपसा केला जातो. त्यासाठी रावेत येथे पालिकेने जलउपसा केंद्र उभारले असून त्याठिकाणावरून पाणी उचलून त्यावर योग्य प्रक्रिया करून ते पाणी जलवाहिनीद्वारे नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते.
तरी गेल्या काही महीन्यांपासून या उपसाकेंद्राजवळ नदीपत्रात वारंवार मेलेली जनावरे तसेच जनावरांची चरबी टाकण्याचं काम अनोळखी समाजकंटकांकडुन केलं जात असल्याचे थेरगाव सोशल फाउंडेशनच्या निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीरस्वरूपाची आहे. त्यासाठी आम्ही गेल्या २ महिण्यापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला याबाबत पाठपुरावा करीत आहोत. यामुळे पाण्यामध्ये जर काही विध्वंसक घटक समावेश झाला तर संपूर्ण शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. हि अतिसंवेदनशील बाब असल्याने आपण त्वरित या नदीपात्राच्या दोन्ही बाजून CCTV कॅमेरे बसवून हा परिसर आपल्या निगरानीत ठेवावा. जेणेकरून त्याठिकाणावरून पाण्यामध्ये काही अनुचित व विध्वंसक घटक मिसळण्याचे काम कोणाकडून होता काम नये. पण अजुन ही महापालिकेकडुन यावर कोणतीच दखल घेण्यात येत नाहीये. तरी आयुक्तानी त्वरित याबाबत योग्य ती उपायोजना करावी अन्यथा थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.