पिंपरी (प्रतिनिधी):- गोरगरीब नागरिकांचे रेशनिंग ऐन दिवाळीत बंद केल्याने त्यांना प्रपंच चालविणे मुश्किल झाले आहे. गोरगरिबांना रेशनिंग देण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. रेशन आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे, गोरगरिबांना साखर मिळालीच पाहिजे यासारख्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे, महिला विभाग अध्यक्ष गंगाताई धेंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर मंगला कदम, प्रवक्ते फजल शेख, विजय लोखंडे, आनंदा यादव, कविता खराडे, अरुणा कुंभार, पुष्पा शेळके, प्रमोद साळवे, पौर्णिमा पालेकर, संगीता जाधव आदी सहभागी झाले होते.
यावेळी संजोग वाघेरे म्हणाले, अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना जे धान्य द्यायला हवे, त्याचा काळा बाजार होत आहे. प्रत्येक दुकानदाराचे दरमहा ऑडिट झाले पाहिजे. एपीएल केशरी कार्डधारकांना दिवाळीनिमित्त गहू, तांदूळ, साखर, तूरडाळ, गोडेतेल, रॉकेल मिळाले पाहिजे तसेच पिवळे रेशन कार्डसाठी उत्पन्न मर्यादा १८,००० ऐवजी ७५,००० करावी, केशरी कार्ड धारकांची उत्पन्न मर्यादा ९९००० रू.वरून १५०००० करावी, आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, आणण सुरक्षा योजनेचे फेर सर्वेक्षण व्हावे आदी मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
मंगला कदम म्हणाल्या की, एकीकडे गॅस दरवाढीने कंबरडे मोडले आहे. दुसरीकडे रेशनिंगवर धान्य, साखर, रॉकेल मिळत नाही. बायोमेट्रिक सारख्या बाबींमुळे रेशनिंग दुकानदारही अडचणीत आहेत.