पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत बहिणाबाई चौधरी उद्यानातून मगरीची पिल्ले, अजगरांची चोरी होते, एवढे मोठे अजगर चोरीला जाताच कसे, अजगराची चोरी होत असताना सुरक्षारक्षक काय करत होते. त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती, त्या चौकशांचे पुढे काय झाले, दोषींवर कारवाई केली का, असे विविध प्रश्न नगरसेवकांनी महासभेत उपस्थित केले. तसेच मगरीप्रमाणे उद्या आयुक्तांचीही चोरी होते की काय, अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केली.
आज झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. विषयपत्रिकेवर नेहरुनगर येथील गुलाब पुष्प उद्यानाजवळील उद्यान विभागाच्या जागेवर प्राणी संगोपन केंद्र उभारण्याचा विषय होता. त्या विषयावर चर्चा करताना नगरसेवकांनी आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले.
माजी महापौर व नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या की, उद्यानातून एवढे मोठे अजगर चोरीला जातात कसे, त्यावर कारवाई का केली नाही, ज्यांच्यावर संशय आहे. त्यांना निलंबित का केले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उद्यानाबाबत ‘षडयंत्र’ सुरु असल्याचे त्या म्हणाल्या. नगरसेवक दत्ता साने म्हणाले, ” सहा महिन्यापासून प्रशासन झोपले आहे. उद्यानात सुरक्षारक्षक असताना अजगर, मगरींची चोरी होतेच कशी? सुरक्षारक्षक काय करत होते? महापालिकेच्या वस्तूची चोरी झाल्यावर त्याला जबाबदार कोण ? तसेच मगरी प्रमाणे उद्या आयुक्तांचीही चोरी होती की काय, असा प्रश्न पडला आहे” असे साने म्हणाले.
मगर, अजगर चोरी प्रकरणाचे काय झाले, त्याचा खुलासा करण्याची मागणी साने यांनी केली. तसेच चोरीच्या वेळी जो कर्मचारी उद्यानात हजर नव्हता. त्यालाच निलंबित केले आहे. चोर सोडून सन्यासाला शिक्षा दिली जाते, हे चुकीचे असल्याचे साने म्हणाले.
सचिन चिखले म्हणाले, “मगर, अजगर चोरीचे काय झाले.. त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती, समितीने काय चौकशी केली? समितीच्या अहवालाचे काय झाले असा सवाल चिखले यांनी विचारला.