पिंपरी (Pclive7.com):- शिरुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचारात जोर भरण्याचा प्रयत्न केला आहे. पण, या निवडणुकीत ‘किंगमेकर’ असलेल्या भोसरी विधानसभा मतदार संघात अद्यापही दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला सूर गवसलेला नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याकरिता अजित पवार यांनी शिवसेना शिंदे गटातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला आणि त्यांना ‘घड्याळ’च्या चिन्हावर उमेदवारी दिली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून ‘तुतारी’ या चिन्हावर विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढवत आहे.
गेल्या निवडणुकीत २०१९ मध्ये भोसरी विधानसभा मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना सुमारे ३७ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा अशी मतांची गोळाबेरीज मोठी होणार असून, मताधिक्य कायम ठेवण्याची संधी आढळराव पाटील यांच्याकडे आहे. मात्र, या मतदार संघातील दोन बलाढ्य नेते भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडगे अद्याप प्रचारात ‘ॲक्टिव्ह’ नाहीत.
निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने डॉ. अमोल कोल्हे यांनी आतापर्यंत ६ वेळा भोसरीत दौरा केला आहे. तर, आढळराव पाटील यांनी चारवेळा भोसरीत प्रचार दौरा केला. दोन्ही दौऱ्यांचे निरीक्षण केले असता, अद्याप दोन्ही उमेदवारांना ‘भोसरीचा किल्ला सर’ करण्यासाठी पाठबळ मिळत नसल्याचे चित्र आहे.
वास्तविक, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे शिरुर लोकसभा लढण्यासाठी प्रचंड इच्छुक होते. २००९ मध्ये लांडे यांनी आढळराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत लांडेंचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये आणि २०१९ मध्येही लांडे यांनी लढण्याची तयारी केली. मात्र, अजित पवार यांनी त्यांना तिकीट दिले नाही. २०२४ मध्ये महायुतीकडून लांडे उमेदवार होतील, असा कयास बांधला जात होता. मात्र, शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश करून तिकीट देण्यात आले. गेल्या १५ वर्षांपासून लांडे यांनी आढळराव यांच्याविरोधात पक्षकार्य केले आणि आता त्यांचा प्रचार करणे लांडे यांच्यासाठी अवघड झाले आहे. तसेच, आढळराव पाटील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही फारसे लक्ष न दिल्यामुळे लांडे तटस्थ आहेत, असे चित्र आहे.
दुसरीकडे, भोसरी विधानसभेतील भाजपाचे आमदार महेश लांडगे पूर्वाश्रमी राष्ट्रवादीत होते. मात्र, स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक, २००९ ची विधानसभा आणि २०२४ ची विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी पक्षाचे नेते अजित पवार यांनी संधी दिली नाही. त्यामुळे लांडगे समर्थकांनी (नारळ ग्रुप) थेट अपक्ष निवडणूक लढवली होती. प्रचंड मोदी लाटेत ही निवडणूक लांडगे यांनी जिंकली. राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांची मक्तेदारी आणि अजित पवारांकडून होणारा दुजाभाव यामुळे लांडगे यांनी संघर्ष करावा लागला. २०१७ मध्ये लांडगे समर्थकांनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीशी दोन हात करीत स्व. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेवर ‘कमळ’ फुलवले होते. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी तसेच ‘घड्याळ’शी जळवून घेताना लांडगे आणि समर्थकांना अवघडल्यासारखे होत आहे. परिणामी, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी विलास लांडे आणि महेश लांडगे अलिप्त दिसत आहेत.
भोसरी मतदार संघात विलास लांडे यांना मानणारा सुमारे ४० हजार मतदार भोसरीत आहे. शिक्षण संस्था आणि औद्योगिक कंपनीच्या माध्यमातून ५ हजार कामगारांपर्यंत लांडेंचा थेट संपर्क आहे. भोसरीतील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या पाठीशी आहे. तर, महेश लांडगे यांच्याकडे दोन माजी महापौर, दोन माजी स्थायी समिती सभापती, दोन माजी क्रीडा समिती सभापती, माजी शिक्षण समिती सभापती यांच्यासह प्रत्येक प्रभागात स्थानिक प्रभावशाली समर्थकांची मोठी फौज आहे. हा सर्व लवाजमा सध्या शांत असल्यामुळे आढळराव पाटील यांचा प्रचार परिणामकारक होत नाही. आढळराव पाटील यांची प्रचार यंत्रणा शिवसेना नेते इरफान सय्यद यांच्यावर अवलंबून आहे.
याउलट, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१९ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरी, खेड आणि हडपसर अशा तीन विधानसभा आणि कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव, जुन्नर आणि शिरुर अशा तीन विधानसभा मतदार संघातील यंत्रणा नियंत्रणात ठेवली होती. यावेळी मात्र, डॉ. कोल्हे यांना बूथपासून संपूर्ण यंत्रणा शून्यातून निर्माण करावी लागली आहे. यासह आर्थिक नियोजनही करण्याचे तगडे आव्हान आहे. तसेच, भोसरी मतदार संघातील पहिल्या फळीतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे केवळ युवक राष्ट्रवादीचे इम्रान शेख मतदार संघात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे कोल्हे आणि आढळराव पाटील या दोन्ही उमेदवारांना प्रचाराची रणनिती आणि नियोजन बदलावे लागेल, अशी स्थिती आहे.