पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात गेल्या दहा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि आरोग्य विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. सर्व विभाग आपली जबाबदारी झटकत आहेत. पालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. पालिकेने त्वरित स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. अन्यथा महापालिका आयुक्तांना दूषित पाणी पाजण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच स्वखर्चाने हे पाणी खासगी प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पिंपरी महापालिका मुख्यालयातील विरोधी पक्षनेत्याच्या दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना साने पुढे म्हणाले, चिखली परिसरात दाट लोकवस्ती आहे. या परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. चिखलीतील यशवंत कॉलनी, मनिषा कॉलनी या परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात दोन ते तीन हजार लोकवस्ती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून होणा-या दूषित पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात दूषित पाणीपुरवठ्याचे नमुने आणून दिले आहेत.
दूषित पाणी प्यायल्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. पोटाचे विकार होत आहेत. पाणीपुरवठा विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. पालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. चिखली परिसरात त्वरित स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही साने यांनी केली.
पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयात देखील दूषित पाणीपुरवठा होत आहे. मुख्यालयातील पाण्याच्या टाक्यांची नियमितपणे साफसफाई केली जात नाही. त्यामुळे पदाधिकारी, अधिका-यांना दूषित पाणी प्यावे लागते. पाण्याला दुर्गंधी येत आहे. पाण्याच्या टाकीचे ऑडीट करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.