पुणे (Pclive7.com):- नोटबंदीचा निर्णय हा अताताईपणाने घेतला असून एका वर्षापूर्वी भाजपने हा निर्णय घेत असताना निष्पाप लोकांचा बळी घेतला असल्याची टीका यावेळी अजित पवारांनी केली. नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, नोटबंदीचा हा निर्णय घेतल्यानतंर काळा पैसा, दहशतवाद, संपेल असे सांगितले होते. पण याबद्दल कुठेही सरकार गंभीर दिसत नसून या निर्णयामुळे साडेतीन लाख नोकऱ्या गेल्या. व्यापाऱ्यांचीही दिवाळी समाधानकारक गेली नाही. यामुळे नोटाबंदीचा निर्णय फसला असल्याचे पवारांनी म्हटले. भाजप जरी हा दिवस साजरा करत असेल तर ती दुखाची बाब आहे. त्यामुळे या सरकारने लोकांना नोटाबंदी बद्दलचे उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. या मोर्चामध्ये नोटाबंदी विरोधात अनेक आशयाचे फलकही दिसत होते. मंडईपासून सुरुवात झालेल्या या मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, नोटबंदीचा फायदा फक्त श्रीमंतांना झाला. कॅशलेस व्यवहाराचा फटका सामान्यांना बसत आहे. प्रत्येक व्यवहारावर कमीशन घेतले जात आहे. नोटबंदी दिवस भाजप साजरा करत आहे. त्यांची कीव करावी असे वाटते. रांगेत मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याचा विसर भाजपला पडला आहे.
सहकार चळवळ मोडीत काढण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. जिल्हा बँकांकडे अजूनही कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहे. मी लाभार्थी जाहिरात फसवी आहे. कर्ज माफी योजनेत सावळा गोधंळ झाला आहे. दिवाळीत पैसे मिळणार होते. अजून पैसे मिळाले नाहीत. डिसेंबर अखेर देखील पैसे मिळणार नाहीत असे दिसतेय. आयटी विभागाचा गोधंळ आहे. सरकारचा दावा काही असला तरी, वीस लाख शेतकऱ्यांनाच कर्ज माफी मिळेल असे दिसतेय.