वाकड (Pclive7.com):- धारदार शस्त्राने हल्ला झाला. डाव्या हाताचा पंजा शरीरापासून वेगळा झाला, उजव्या हाताचा पंजा ही अर्धा कापला गेला. तरी आरोपींना काही तासांतच जामीन मिळाला. यामुळं संतप्त नातेवाईकांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायसमोर आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर वाकड पोलिसांना जाग आली असून तिन्ही आरोपींना अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात पुन्हा धाव घेण्याच्या दृष्टीने पावलं पडायला लागलीत.

आम्ही हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला, आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी युक्तिवाद ही केला, पोलिसांनी त्यादृष्टीने भक्कम बाजू ही मांडली. मात्र नव्या कायद्याच्या आधारावर न्यायालयाने आरोपींना जामीन दिला. असा दावा वाकड पोलिसांनी केला आहे.
रोहन निमज, शुभम पवार आणि प्रशांत सकट अशी जामिनावर बाहेर पडलेल्या आरोपींची नावं आहेत. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या रोहनचे घराशेजारी राहणाऱ्या राहुल कणघरे सोबत पूर्वीचे वाद होते. त्यामुळं राहुल आणि रोहनमध्ये खटके उडायचे. यातून रोहन अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टीतून उचकवायचा. चार दिवसांपूर्वी ही दोघांमध्ये असाच वाद झाला होता. या रागातून रोहनने त्याचे मित्र शुभम आणि प्रशांतच्या मदतीने राहुलला संपवण्याचा कट रचला.
घरात बसलेल्या राहुलला विश्वासात घेऊन त्याने बाहेर बोलावलं. तिथून ते थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्याना शेजारी आले, तिथं दोन्ही मित्रांनी राहुलला पकडले अन रोहनने शस्त्राने डोक्याच्या दिशेने वार केला. राहुलने डोक्यावरचा वार चुकवण्यासाठी हात मध्ये घातला. यात डावा पंजा शरीरापासून वेगळा झाला तर उजवा पंजा अर्धा कापला गेला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी रोहनसह दोन्ही मित्रांना बेड्या ठोकल्या. पण प्रकरण इतकं गंभीर असताना दुसऱ्याचं दिवशी तिन्ही आरोपींना जामीन कसा काय मिळाला? हा प्रश्न उपस्थित करत नातेवाईक संतप्त झाले.
नातेवाईकांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायसमोर आंदोलन छेडलं. त्यानंतर वाकड पोलिसांना जाग आली. नातेवाईकांशी चर्चा करुन, नव्या कायद्यामुळं जामीन मिळाल्याचा दावा वाकड पोलिसांनी केला आहे. मात्र या तिघांना पुन्हा एकदा अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचं वाकड पोलीस म्हणाले आहेत. त्या दृष्टीने पावलं आता पोलिसांनी टाकायला सुरुवात केली आहे. ती परवानगी मिळेपर्यंत हे तिन्ही आरोपी पसार होणार नाहीत, याची खबरदारी पोलीस घेणार का? याकडे ही सर्वांचं लक्ष लागून आहे.