भारत संकल्प सभेतून मांडला विकसित भारताचा लेखाजोखा; पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे शहरात मंडलनिहाय जनजागृती उपक्रम
पिंपरी (Pclive7.com):- भाजपाच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षाच्या कालखंडात भारताच्या वंचित घटकाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. भारताचा अमृत काळ – सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण यासारख्या अनेक गोष्टींवर मोदी सरकारने यशस्वीपणे कार्य केले. मोदी सरकारच्या माध्यमातून देशात घडवून आणलेले ऐतिहासिक बदल, गरिबांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या योजनांचा आढावा, तसेच “विकसित भारत” या संकल्पाकडून सिद्धीकडे नेणारा हा काळ देशासाठी सुवर्णकाळ आहे, अशा भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारची सेवा ते सूशासन यशस्वी 11 वर्ष या विषयावर आयोजित केलेली विकसित भारत संकल्प सभा प्रभाग क्रमांक 9 नेहरूनगर, इंद्रायणी नगर, धावडे वस्ती मंडळाच्या वतीने नेहरूनगर अजमेरा कॉलनी येथे पार पडली.
पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे, दक्षिण भारतीय आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश अण्णा पिल्ले, कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हनुमंत अण्णा लांडगे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडीगेरी, सरचिटणीस अजय पाताडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला माजी स्वीकृत नगरसेविका वैशाली खाडे, अल्पसंख्याक आघाडीचे माजी अध्यक्ष फारुख भाई शेख, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन आप्पा ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, आशा काळे, छाया वाघिरे, सचिन शिंदे, मंगेश कुलकर्णी, हेमंत शिर्के, मोहन पवार यांच्यासह इतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या 11 वर्षांमध्ये भारताच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला आहे. नियोजन, शिस्त आणि देशासाठी कटिबद्ध हीच भाजपची नीती आहे. देशात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अमुलाग्र बदल घडताना दिसत आहेत. स्थानिक पातळीवर देखील अत्याधुनिक वाहतूक सेवा, प्रशासकीय सेवांचे सक्षमीकरण, पारदर्शक कारभार यातून नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील हात बदल घडवून आणायचा आहे.– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा.
मोदी सरकारने गेल्या 11 वर्षांत अद्वितीय कामगिरी बजावली. या 11 वर्षांतील काळात देशाने ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ यासारख्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवत प्रगतीचा मार्ग धरला. ‘आत्मनिर्भर भारत’या संकल्पनेपासून सुरू झालेला प्रवास आता ‘विकसित भारत’ या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करत आहे. देशाच्या इतिहासातील हा कालखंड सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. गेल्या दशकातील उल्लेखनीय कामगिरीचे सविस्तर चित्रण करण्यात आले. विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण निर्णय, योजना आणि त्यांचा सामान्य जनतेवर सकारात्मक परिणाम झाला आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.