शहर काँग्रेसच्या संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप
पिंपरी (Pclive7.com) – मोदी लाट ओसरल्याची चिन्हे आहेत. नागपुरचे आमदार आशिष देशमुख, खासदार नाना पटोले यांचा काँग्रेस प्रवेश सुरूवात आहेत. शिवसेनेचे नेते सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे भाषणातून देते, त्यांनी आपली आक्रमक भूमिका कृतीतून दाखवावी असा टोला माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला.
पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहर काँग्रेसच्या वतीने तळवडे येथे सर्व सेलचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसांच्या संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप आज झाला. त्यावेळी हर्षवर्धन पाटील मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. यावेळी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, शिबिराचे प्रशिक्षक आमदार रामहरी रुपनवर, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, प्रदेश सरचिटणीस डॉ. रत्नाकर महाजन, बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर कविचंद भाट, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, पुणे मनपाचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी नगरसेवक विष्णुपंत नेवाळे, महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बिंदु तिवारी, सेवादल शहराध्यक्ष मकर यादव आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, मोदी-शहांच्या हुकूशाहीला कंटाळून देशभरातील भाजपाचे आमदार, खासदार काँग्रेसच्या वाटेवर आहेत. मोदी लाट ओसरल्याची ही चिन्हं आहेत. नागपुरचे आमदार आशिष देशमुख, खासदार नाना पटोले यांचा काँग्रेस प्रवेश ही सुरूवात आहे. शिवसेनेला फटकारताना पाटील म्हणाले की, शिवसेनेच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे भाषणात देण्याऐवजी आपली आक्रमक भूमिका कृतीतून दाखवावी. जाहिरातबाजीत फसलेले फडणवीस सरकार निष्क्रीय ठरले असल्याचे ‘जलयुक्त शिवार’ प्रकरणातून महाराष्ट्रातील शेतक-याला दिसले आहे. शेतक-यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव फक्त कागदावरच राहिला आहे.
पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले की, काँग्रेसचे नेते, पदाधिकारी यांनी तळागाळात काम करणा-या कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे. राम मंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम या प्रश्नांचे काय झाले, याची उत्तरे सर्वसामान्य नागरिकांना सरकारने दिली पाहिजेत. १९९४ मध्ये युती सरकारने ४० लाख घरे बांधू, २५ लाख नोक-या देऊ, एन्रॉन समुद्रात बुडवू अशा वल्गना केल्या होत्या. प्रत्यक्षात भाजपा-शिवसेनेचे सरकार एकही आश्वासन पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे त्यांना जनतेने घरी बसवले. आताही अशीच परिस्थिती असून, या निवडणुकीत जनता काँग्रेसच्या मागे खंबिरपणे उभी राहिल, असे साठे यांनी सांगितले.
या शिबिरास आजी-माजी आमदार, विविध सेलचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश बोराटे यांनी तर आभार रमेश बागवे यांनी मानले.