पुणे (Pclive7.com):- अखेर मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. १८ ते १९ मे रोजीपर्यंत मान्सून हा अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसानं अंदमानात हजेरी लावली आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटं, अंदमानातील समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. यंदाचा मान्सून हा उशिरा दाखल होणार अशी माहिती स्कायमेटकडून वर्तवण्यात आली होती. तर अंदमानमध्ये १८-१९ मेपर्यंत मान्सून धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे ३० मेपर्यंत मान्सून दाखल होतो. पण यावेळी मान्सून काही दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचं म्हटलं आहे. मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आलं होतं.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा अल नीनो वादळाचा प्रभाव कमी असणार आहे. जर त्याचा प्रभाव असाच कमी राहिला तर शेतकऱ्यांसाठी यंदाचा मान्सून आनंदाचा आहे.