चाकण (Pclive7.com):- राष्ट्रीय महामार्ग 60 (जुना 50 ) वरील इंद्रायणी नदी (मोशी) ते चांडोली या टप्प्यातील 17/700 कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामुळे चाकणचा तळेगाव चौक आणि एमआयडीसी चौकातील वाहतूक कोंडी फुटण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची प्रतिक्रिया शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
चाकणमध्ये होणारी वाहतूक कोंडी हा लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे निवडणुका पार पडल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी सातत्याने नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासमवेत बैठका घेतल्या. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतः केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याशी चर्चा केली.
पालकमंत्री पवार यांची शिष्टाई आणि डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश येऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंद्रायणी नदी (मोशी) ते चांडोली या 17 /700 कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू केली. सुमारे 648.84 कोटींच्या या कामासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2021 असून 18 जानेवारी रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन मार्च महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
नाशिक फाटा ते मोशी या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील लांबीतील भूसंपादनाच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याने या रस्त्यांच्या सहापदरीकरणाच्या कामाचे दोन भाग करण्याची भूमिका डॉ. कोल्हे यांनी लावून धरल्यामुळेच चाकणच्या तळेगाव चौक व एमआयडीसी चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पाठोपाठ नाशिक फाटा ते मोशी या लांबीतील भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्याची लवकरात लवकर निविदा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांची कामे हा माझा प्राधान्याचा विषय असून राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने तळेगाव-चाकण आणि पुणे-नगर रस्ता हे दोन अतिशय महत्त्वाचे असणारे रस्ते येत्या काही काळात आपण मार्गी लावणार आहोत असे सांगून डॉ. कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री पवार आणि केंद्रीयमंत्री गडकरी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.