पिंपरी (Pclive7.com):- अखंड महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोणी विचारलं असतं असे बेताल अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी यासाठी महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष तसेच अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र स्वरूपात आंदोलने केलेली आहेत. तरी देखील आजपर्यंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील शिवप्रेमींची माफी मागितलेली नाही.
राज्यपाल रविवारी दिनांक २७ मार्च रोजी दुपारी २ वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे राष्ट्र गौरव पुरस्काराचे वितरण करण्यासाठी येणार आहेत. त्यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने चिंचवड येथे काळया फिती लावून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यात येणार आहे, असे संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे यांनी निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.