मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचा उपोषणाचा इशारा; ३ लाख ६७ हजार भरा अन् उद्यान विभागाची माहिती मिळवा..!
पिंपरी (Pclive7.com):- नवी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरातील अनेक झाडांना संरक्षण जाळ्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. या मोठ्या झाडांच्या जाळ्या काढा अशी मागणी वारंवार मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाकडे गेल्या तीन महिन्यांपासून तक्रार करूनही हा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आता लवकरात लवकर या जाळ्या न काढल्यास उद्यान विभागासमोर आम्ही उपोषणाला बसू असा इशारा मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी दिला आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2022/07/Screenshot_2022-07-21-18-24-51-29_439a3fec0400f8974d35eed09a31f914-280x300.jpg)
जोगदंड यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात अनेक विकास कामे चालू आहेत. शहरात काँक्रिटीकरण वाढत आहे. शेतकऱ्याच्या जमिनी नष्ट होत आहेत. सगळीकडेच वृक्ष लागवडी पेक्षा वृक्षतोडीचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढिची ऑक्सिजनची सोय म्हणून वृक्षारोपण केले. रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2022/07/IMG-20220717-WA0001-300x300.jpg)
परंतू वृक्षांना संरक्षण देण्यासाठी लोखंडी गोलाकार जाळ्या १० वर्षापूर्वी लावल्या आहेत. आता ही झाडे खूप मोठी झाली आहेत. आणि झाडाच्या बूंद्यामध्ये लोखंडी जाळ्या घुसलेल्या आहेत. काही ठिकाणी जाळ्या तुटलेल्या आहेत. आता मोठ्या झाडांना अशा संरक्षक जाळ्याची आवश्यकता नाही. यामुळे झाडांची वाढ खुंटत आहे. झाडांच्या बुंद्याला इजा झाल्या आहेत. अशी काही झाडे फेमस चौकाच्या जवळ, गणपती मंदिराच्या समोर आहेत.
इतरही ठिकाणी अशा प्रकारची झाडे महापालिकेने शोधून मोठ्या गोलाकार जाळ्या काढाव्यात म्हणजे झाडाची वाढ होऊन झाडे मोकळा श्वास घेतील, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी उद्यान विभागाचे प्रभारी अधिक्षक गोरखनाथ गोसावी यांच्याकडे तीन महिन्यांपासून अनेकदा प्रत्यक्ष भेटून व दोनदा निवेदन देऊन केली होती. भेटल्यावर फक्त जाळी काढू म्हणून सांगतात. अनेक वेळा प्रसारमाध्यमातून बातम्या ही प्रसिद्ध झाल्या. मात्र उद्यान विभागाने यावर कोणतीही कृती केली नाही. यावरून उद्यान विभाग काम करण्यासाठी किती तत्परता आहे हे दिसुन येते. सरकारी काम सहा महीने थांब, ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते. जर या पंधरा दिवसांत त्यांनी संरक्षक जाळ्या काढल्या नाहीत तर आम्ही सर्व कार्यकर्ते गुलाबपुष्प उद्यानासमोर उपोषण करु असा इशारा अण्णा जोगदंड यांनी दिला आहे.
यावर निवेदनावर संस्थाध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, विकास शहाणे, मीनाताई करांजवणे, संगीता जोगदंड, गजानन धाराशिवकर, मुरलीधर दळवी, अँड सचिन काळे, यांच्या स्वाक्षर्या आहेत.
३ लाख ६७ हजार भरा अन् उद्यान विभागाची माहिती मिळवा..!
यावेळी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, संस्थाध्यक्ष विकास कुचेकर यांनी उद्यान विभाग झाडाची माहिती मागवली होती. तर त्यांना ३ लाख ६७ हजार भरायला सांगतात. यावरुनच उद्यान विभाग नक्कीच काहीतरी माहिती लपवत आहे हे यावरून दिसून येत आहे, ती झाडे वाचविण्यास दुर्लक्ष करीत आहेत, असं जोगदंड यांनी म्हटले आहे.