मुंबई (Pclive7.com):- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या तुफानी भाषणासाठी परिचित आहेत. त्यांची अनेक वक्तव्य वादाची सापडल्याचेही आपण पाहिले आहे. अलिकडेच मुंबई बाबत त्यांनी केलेलं वक्तव्य हे चांगलंच वादात सापडलं होतं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासहीत विरोधी पक्षांनी सडकून टीका केली होती.
तर या राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असे मुख्यमंत्री आणि भाजप यांच्याकडून सांगण्यात आले होते. तरीही राज्यपालांवरची टीका काही केल्या थांबत नव्हती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असेही ते म्हणाले होते. मात्र आता राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी अखेर माफी मागितली आहे. त्यांचे मुंबईबद्दलचे वक्तव्य त्याने अखेर माघारी घेत महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो, असे विधान केले आहे. त्यांनी याबाबत एक प्रसिद्ध पत्रक काढलं आहे.
राज्यपालांचा माफीनामा जसाच्या तसा..
प्रसिद्धीसाठी निवेदनदिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चूक झाली.महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.भगत सिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र