पिंपरी (प्रतिनिधी):- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांची राजकीय चर्चा झाली. त्या बैठकीला राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते. परंतू राणे यांच्या प्रवेशाला अजून मूर्त स्वरूप आले नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले. पिंपरी चिंचवडमधील पक्षाच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, शिवसेनेला सहन करण्याचा प्रश्नच नाही, त्यांचे मंत्री बैठकांना येतात, सरकारला कोणता ही धोका नाही. आमचा पक्ष पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र अशी म्हणण्याची वेळ आल्याची टीका शरद पवारांनी केली होती त्यावर मी बोलणार नाही असे सांगतानाच आम्ही निवडणुका जिंकलोय त्यातूनच जनता आमच्या पाठीशी आहे हे स्पष्ट होत असल्याचा दावा दानवे यांनी व्यक्त केला.
राज ठाकरे यांचे फेसबुक पेज पाहिले नाही असे सांगतानाच सोशल मिडियाचे भाजपवर बुमरँग झाल्याच्या राज ठाकरेंच्या टीकेवर बोलणार नाही असेही ते म्हणाले. पण त्याच वेळी सोशल मीडिया वर व्यक्त होण्याचा सर्वांचाच अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.