नवी दिल्ली (Pclive7.com):- राज्याच्या राजकारणासाठी आज मंगळवारी दि.1 नोव्हेंबर महत्त्वाचा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात मंगळवारी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत सुनावणी होणार आहे.
सुभाष देसाई यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत ही याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत खटल्यासंदर्भात कालमर्यादा निश्चित केली जाऊ शकते.
ठाकरे गटाकडून कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे ज्येष्ठ वकील बाजू मांडणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या वतीने संजय किशन कौल हे युक्तीवाद करणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ते तुषार मेहता बाजू मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे उभ्या राज्याचं लक्ष असणार आहे. तसेच या 16 आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.