सीमाप्रश्नावर सरकार बघ्याची भूमिका घेत असून, विधिमंडळात ठराव आणण्यापासून पळ काढत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. तसेच या मुद्यावरून कामकाज रोखण्याचा इशारा विरोधकांनी दिला. त्यावर सीमाप्रश्नावर राज्य सरकार तसूभरही मागे हटणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. कोणत्याही स्थितीत महाराष्ट्र सीमावासीयांच्या मागे उभा राहील, असे नमूद करीत मंगळवारी या विषयावर दोन्ही सभागृहांत ठराव मांडण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.
विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सीमाप्रश्न उपस्थित करीत सरकारवर टीकास्त्र सोडले. सीमाभागातील मराठीजनांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत आहे. कर्नाटकच्या विधिमंडळात सीमाभागासंदर्भातील ठराव मंजूर करताना महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, अस्मितेला धक्का लावण्याचे काम झाले आहे. कर्नाटकच्या या आगळिकीला ‘जशास तसे’ उत्तर दिले पाहिजे. त्यासाठी सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र भक्कमपणे उभा आहे, हा विश्वास देण्यासाठी या लढय़ाला संपूर्ण पाठींबा देणारा ठराव आजच सभागृहात एकमताने मंजूर करावा, अशी मागणी पवार यांनी केली. सरकार सीमाप्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही पवार यांनी केला.