पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात सध्यस्थितीत केवळ २८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा जूनअखेर पुरेल एवढाच आहे. गतवर्षीपेक्षा धरणातील पाणीसाठा यावेळेस कमी झाला आहे. त्यामुळे जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यास शहरावर आणखी पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील साडेचार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराची सध्याची सुमारे ३० लाख लोकसंख्या आणि भविष्यातील ३० वर्षातील लोकसंख्या वाढीचा विचारात घेऊन पालिकेने आंद्रातून शंभर एमएलडी व भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्यात येत आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून केवळ ५० एमएलडी पाणी निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून, तक्रारींमध्ये वाढ होत आहे.
तसेच पवना धरणात सध्या २८ टक्के पाणीसाठा असून हा साठा जून अखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला ३०.९२ टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. दरम्यान, पवना आणि आंद्रा धरणातील पाणी जूनअखेर पुरेल एवढा उपलब्ध आहे. पण, जूननंतर पावसाने ओढ दिल्यास शहरावर पाणी कपातीचे संकट येणार आहे. त्यावेळेस निश्चितपणे पाणी कपात करावी लागेल. तसेच शहरातील अनेक गृहनिर्माण संस्थांना टँकरद्वारे पाणी घ्यावे लागते. प्रतिमाणसी दरडोई १३५ लिटर या निर्धारित मानकाप्रमाणे पाणी दिले जाते. ज्यांना जास्त पाणी लागते, ते खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी घेत आहेत.