पिंपरी (Pclive7.com) :- पवना धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये पिंपरी- चिंचवडकरांना पाणीकपातीच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पाण्याचा अतिरिक्त वापर करणारे नागरिक तसेच वाहन धुणे, वॉशिंग सेंटरला पिण्याचे पाणी वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
शहराला मावळ तालुक्यातील पवना धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. शहरामध्ये गेल्या साडेतीन वर्षापासून एक दिवसा आड पाणीपुरवठा सुरू आहे. धरणातील पाणीपातळी ४७ टक्क्याखाली आली आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कडक ऊन असणार आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आणखी वाफ होण्याची शक्यता आहे. परिणामी, धरणातील पाण्याची पातळी आणखी खालावेल, अशा परिस्थितीमध्ये शहरामध्ये पाणी कपातीचे संकट ओढावू शकते. त्यामुळे उपलब्ध पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. मात्र, अनेक नागरिक महापालिकेच्या नळाला पाणी आल्यानंतर वाहने धुणे तसेच रस्त्यावर पाणी सोडून देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो, तर वॉशिंग सेंटर चालक पिण्याचे पाणी व्यवसायासाठी वापरतात. पिण्याचे पाणी वापरल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते. त्यामुळे अशा वॉशिंग सेंटर चालकांवर महापालिका कारवाई करणार आहे. जे व्यावसायिक पिण्याचे पाणी वाहने धुण्यासाठी वापरतात त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
निघोजे येथील इंद्रायणी नदीतून १०० एमएलडी अतिरिक्त पाणी शहराला मिळणार आहे. त्यासाठी चिखली येथे जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, त्याचे उद्घाटन झाले नसल्याने अद्याप अतिरिक्त पाणी शहरवासीयांना मिळाले नाही.
धरणामध्ये जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढे पाणी आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होणे चांगली बाब नाही. अनेक नागरिक विनाकारण वाहने धुतात, तसेच रस्त्यावर पाणी सोडून देत असल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे पाण्याची नासाडी होते. अशाप्रकारे पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांवर यापुढे महापालिका प्रशासन कारवाई करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे.
– प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त