आळंदी (Pclive7.com):- वारकरी सांप्रदयाची श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी आजही फेसाळलेली आहे. कालच्या पेक्षा आज याचं प्रमाण अधिकचं वाढलं दिसत आहे. हिवाळी अधिवेशनात हाच मुद्दा लक्षवेधी ठरला होता. सत्ताधारी आमदारांनी थेट राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग येत नसल्याचं चित्र आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231229-WA0017-290x300.jpg)
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ गेल्या सात वर्षांपासून ते केवळ कारवाईचा फार्स करण्यात धन्यता मानत आहे. पिंपरी चिंचवडमधील ज्या कंपन्या इंद्रायणीत रसायनयुक्त पाणी सोडतात, त्यांना पाठीशी घालण्याचं काम सुरु असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कानाडोळा करणाऱ्या राज्य सरकारचाही याला पाठिंबा असल्याचं दिसून येतंय का? अशी चर्चा सुरु आहे.
पिंपरी चिंचवडमधील अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्या इंद्रायणीत रसायनयुक्त पाणी सोडतात. त्यांचं हेच पाणी पवित्र इंद्रायणीला जीवघेणी बनवत चालले आहे. गेल्या सात वर्षांपासून अनेकदा ही परिस्थिती उद्भवलेली आहे, त्यावेळीच झोपेचं सोंग घेणाऱ्या प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही.
माऊलींचे दर्शन घेण्यापूर्वी ज्या इंद्रायणीमध्ये वारकरी मोठ्या भक्ती भावाने स्नान करतो आणि आचमन घेतो त्याच इंद्रायणी नदीची झालेली ही अवस्था चिंताजनक असल्याची भावना आळंदीकर व्यक्त करत आहेत.