पुणे (Pclive7.com):- उत्तर महाराष्ट्र थंडीने गारठला आहे. मागील दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात गारठा आहे. बुधवारी जळगावात ९.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या अन्य भागांत किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कर्नाटक ते विदर्भ, अशी वाऱ्याची द्रोणीय रेषा तयार झाली आहे. त्यामुळे राज्यभरात हवेत आद्रर्तचे प्रमाण वाढले आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुढील चार-पाच दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे. बुधवारी राज्याच्या अन्य भागांत किमान तापमानात सरासरी एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. कोरड्या हवेमुळे आणि उत्तर भारतातील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यात गारठा राहणार आहे. बहुतेक ठिकाणी धुके पडून पहाटे दृष्यमानता कमी होण्याचा अंदाज आहे. बुधवारी जळगावात ९.३, नाशिकमध्ये ११.५, पुण्यात १२.०, औरंगाबादमध्ये ११.६ आणि बुलढाण्यात ११.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सोलापुरात सर्वाधिक ३३.८ कमाल तापमानाची नोंद झाली आहे.