पिंपरी (Pclive7.com):- वाचनसंस्कृती वाढवली तरच मराठी भाषा अधिक समृद्ध होईल, त्यासाठी गावोगावी समृद्ध ग्रंथालये उभी राहिली पाहिजेत. मराठी भाषेविषयीचे प्रेम वाढत नाही तोपर्यंत सरकारदेखील भाषेकडे गांभीर्याने पाहणार नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन बडोदा येथील ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने अॅटो क्लस्टर सभागृहात डाॅ. देशमुख यांची प्रकट मुलाखत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा.पिंगळे यांनी घेतली. शिंदेशाही पगडी, स्मृतिचिन्ह व पुस्तक देऊन साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार उल्हासदादा पवार, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, समन्वयक नाना शिवले, गिरिजादेवी कुदळे, राजन लाखे, पुरुषोत्तम सदाफुले, राजेंद्र घावटे, सुहास पोफळे,आदी मान्यवर उपस्थित होते.
डाॅ. देशमुख यांनी संमेलनासाठी शासनाची २५ लाखाची मदत खूपच अपुरी असून त्यात वाढ होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. आपण इतर कामांसाठी भरपूर खर्च करतो मात्र स्वभाषेसाठी करत नाही. इतर राज्यांत भाषेवर प्रेम करणारे राज्यकर्ते आणि नागरिक असल्याने भाषेसाठी ते भरीव काम करत असतात. मराठी भाषेसाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे. शासनाबरोबर आपली सर्वांचीच ती जबाबदारी आहे.केवळ बोलण्यापुरते मराठीवर प्रेम नको तर ते कृतीत उतरले पाहिजे.
ते पुढे म्हणाले, माझ्या साहित्यिक प्रवासात माझ्या आईवडिलांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक लेखक आधी चांगला वाचक असतो. वाचता वाचता त्याच्या जाणीवा समृद्ध होत असतात. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथालये महत्वाची आहेत. अशी समृद्ध ग्रंथालये प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेत निर्माण झाली पाहिजेत. महाराष्ट्रात मराठी शाळांना अधिक समृद्ध करण्याची गरज आहे. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. नवनवे तंत्रज्ञान मराठीत यायला हवे. मराठी विद्यापीठ व्हायला हवे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी टाळण्यासाठी सरकारबरोबर कलावंत, साहित्यिकांनी पुढे यायला हवे. मराठी भाषेच्या बाबतीत शासनाबरोबरच आपणही उदासीन आणि करंटे आहोत. ही वृत्ती बदलली पाहिजे, मी कार्यकर्ता लेखक म्हणूनच काम करणार. साहित्य संमेलनाच्या निधी वाढ व्हावी. ई-मराठी धोरण आणले जावे.मराठीतील चांगले साहित्य अन्य भाषांमध्ये अनुवादित व्हावे. अशा अनेक अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.
डाॅ.कोत्तापल्ले म्हणाले, लेखकाची लोकप्रियता ही मानवी जीवनाला पुढे नेणारी मूल्य नावाच्या गोष्टीतून साहित्यामध्ये प्रकट होत असते. समाज कसा असावा. समाजातील मूल्यांची जपणूक कशी व्हावी. आदर कसा राखला जावा. याविषयीची भूमिका लेखक मांडतच असतो. त्यांनी मांडलीच पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. सूत्रसंचालन डाॅ.अविनाश वाळुंज यांनी केले व नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले. अविनाश ववले, गणेश लंगोटे, संतोष बाबर, बाजीराव लोखंडे, महेंद्र चिंचवडे, विजय कांबळे, प्रविण कुदळे, राजेंद्र करपे, गुरुदास भोंडवे, रोहित खर्गे, सचिन काटे यांनी विशेष परिश्रम घेतले.