पिंपरी (Pclive7.com):- उत्तरप्रदेश येथील गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगून बावधन येथील तिघांचे राहत्या घरातून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार रविवारी (दि.२०) दुपारी दोनच्या सुमारास पाटीलनगर परिसरात घडला आहे.
निलभ रतन (२७), रोमा सिंग (२६) आणि दर्श (५, सर्व रा. पाटीलनगर, बावधन) अशी अपहरण झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एक महिला व एका पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोमा सिंग हिचे पहिले लग्न झाले आहे. पहिल्या पतीसोबत तिचा घटस्फोट झाला असून त्यानंतर तिने निलब याच्याशी लग्न केले. रविवारी अचानक दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चार ते पाचजण पोलिसांच्या वेशात घरी आले. पोलिसांच्या वेशातील इसमांनी ते उत्तर प्रदेश पोलिस असल्याचे सांगितले. या दोघांवर न्यायालयात खटला सुरु असून त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी तात्काळ घेऊन जाण्यात येत असल्याचे सांगत रोमा सिंग आणि निलब यांच्यासह पाच वर्षाच्या चिमुकल्याला बळजबरीने घेऊन गेले.
याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क केला असता अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.