पिंपरी (Pclive7.com):- खासदार श्रीरंग बारणे यांना सलग चौथ्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आलायं. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल एम.के. नारायनन व माजी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एस. कृष्णमुर्ती यांच्या हस्ते चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.
१६ व्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल श्रीरंग बारणे यांना पंतप्रधान पाँईंट फौंडेशनच्या वतीने सलग चौथ्या वर्षीही संसदरत्न पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. प्रथमच निवडून गेलेल्या खासदारांमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांना लोकसभेमध्ये केलेल्या कामकाजाबद्दल आज दि.९ जुन रोजी आय.आय.टी. मद्रास (चेन्नई) येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल वपश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार एम.के. नारायनन व माजी मुख्य निवडणुक आयुक्त टी.एस. कृष्णमुर्ती यांच्या शुभहस्ते “संसदरत्न” पुरस्कार देवून गौरवण्यात आले. या प्रसंगी डायरेक्टर इन्डीयन इन्स्टीट्युट टेक्नॉलॉजी मद्रास डॉ. भास्कर राममुर्ती आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच खासदार बारणे यांच्या बरोबर काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री डॉ.एम. विराप्पा मोईली, ओरिसाचे बिजू जनता दलाचे खासदार भर्तूहरि मेहताब, राज्यसभा खासदार शांताराम नाईक व महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आणि भाजपच्या नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांनाही संसदरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
खासदाराची संसदेतील कामगिरी त्यांचा विविध चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थीती यासंदर्भात पीआरएस इंडीयाने दिलेल्या आकडेवारीवरुन कामगिरीची आढावा घेऊन लोकसभा सचिवालयामार्फत पुरवलेल्या माहितीवरुन याचे मुल्यांकन निवड समिती मार्फत करण्यात येते. त्यानुसार चेन्नई येथील पंतप्रधान पाँईंट फौंडेशनच्या वतीने “संसदरत्न” हा पुरस्कार दिला जातो. १६ व्या लोकसभेच्या गेल्या ४ वर्षातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला, यामध्ये शिवसेनेचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ९३५ प्रश्न उपस्थित केले, २५५ वेळा प्रत्यक्ष चर्चेतील सहभाग घेतला, ९५% उपस्थिती दर्शविली व १६ खाजगी विधेयेके मांडले त्याचबरोबर विविध समितींच्या बैठकीमध्ये सर्वाधिक उपस्थिती आणि स्थानिक खासदार विकास निधीचा सर्वाधिक वापर करून विविध विकासकामे पूर्णत्वास नेली, या कामगिरीबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांना सलग चौथ्या वर्षी हा पुरस्कार मिळाला.