पिंपरी (Pclive7.com):- इंटरनेटवर केवळ माहिती आहे. ज्ञान मिळविण्यासाठी माहितीच्या पलीकडे जावून वाचन साधना करावी लागेल. कारण वाचनाला इंटरनेट नव्हे तर वाचनच पर्याय आहे. म्हणून तर माहिती तंत्रज्ञानाने प्रगत असलेल्या देशात प्रत्येक पुस्तकाच्या लाखो प्रती खपतात असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.
शब्द पब्लिसिटी आणि एल्गार सामाजिक साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार वितरण, राज्यस्तरीय कथा लेखन स्पर्धा बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात धनश्री दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रमुख व्यासपीठावर अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड भाऊसाहेब भोईर, पी.के इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष जगन्नाथ काटे, धनश्री दिवाळी अंकाचे संपादक शिवाजी घोडे, आदी उपस्थित होते.
यावेळी उद्योजक मकरंद पांडे, नितीन धिमधिमे यांना उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक पुरस्कार, विद्युत सनियंत्रण समितीचे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांना भ्रष्टाचार विरोधी केलेल्या कार्याबद्दल आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, सीए बबन डांगले यांना उत्कृष्ट चार्टर्ड अकौंटंट पुरस्कार, हिरालाल व सरस्वती पाटील यांना आदर्श दांपत्य पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
शब्द पब्लिसिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत अंजली घंटेवार-नागपूर (कथा क्षितीज), अरुण देशपांडे – बावधन (वरची खोली), मानसी चिटणीस – चिंचवड (गिरिजा) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. तर पुजा बागूल – नाशिक (कथा – प्राजक्ता) एन.आर.पाटील – चाळीसगाव (भुत्या) चौथे व पाचवे (उत्तेजनार्थ) बक्षीस देण्यात आले.
डॉ. कोत्तापल्ले पुढे म्हणाले कि, भ्रष्टाचार हा समाजाला लागलेला रोग आहे. तो रोग सर्वत्र क्षेत्रातील नागरिकांना जडला आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनला आहे. सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी जनतेचे नोकर म्हणून कधीच काम करीत नाही. मुंबईतील मराठी शाळा बंद करण्याचे कारण म्हणजे तेथील जागांना आलेले भाव. मराठी शाळा बंद करून शाळेची जागा विकायची आणि मलइ खायची हा सरकारचा हेतू आहे. आज ७० टक्के देशातील जनता अत्यल्प उत्पन्नावर दरनिर्वाह करीत आहे.यालाच देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, असे म्हणायचे का ? भ्रष्टाचाराविरोधात कार्य करणाऱा कार्यकर्ता किंवा क्रांतीकारकांची आज हि हत्या केली जाते. हा सामाजिक यंत्रणेत आलेला बिघाड आहे. अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली.
भोईर म्हणाले कि, इंटरनेटच्या जगात हि दिवाळी अंकाची वाचन संस्कृती टिकून आहे ही कौतुकास्पद आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी घोडे यांनी केले.सूत्रसंचालन साहेबराव जाधव यांनी केले तर आभार महादेव हुंबरे यांनी मानले.