पिंपरी (Pclive7.com):- दापोडी परिसरातील नागरिकांना गेल्या दीड वर्षांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नागरिकांसह रास्ता रोको केला. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. आम्ही विरोधी पक्षाचे नगरसेवक असल्याने जाणीवपूर्वक कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप, नगरसेवकांनी यावेळी केला.
दापोडी येथे आज (बुधवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास आंदोलन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका माई काटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
गेल्या दीड वर्षांपासून दापोडी परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत आहे. आठ-आठ दिवस पाणी येत नाही. पाणी आले तरी अंत्यत कमी दाबाने येत आहे. आम्ही तीनही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने जाणीवपूर्वक कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे. विनाकारण नागरिकांना वेठीस धरले जात आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला. तसेच पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांना आंदोलकांनी घेराव घातला.