पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील महिला व विद्यार्थीनींच्या सुरक्षेच्या संदर्भात कडक उपाययोजना करावी तसेच रात्रीच्या वेळी नोकरी निमित्त अथवा अन्य कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी नागपूर पोलिसांच्या धर्तीवर पिंपरी चिंचवडमध्येही यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी महापौर माई ढोरे यांनी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे सोमवारी (दि.९) केली.
महापौर माई ढोरे यांनी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांची भेट घेऊन महिला सुरक्षेबाबतच्या मागण्यांचे निवेदन दिले. तसेच पिंपरी चिंचवडमधील महिला व विद्यार्थीनींच्या सुरक्षा योजनांबाबत चिंता व्यक्त केली. महापौर माई ढोरे यांनी पोलिस आयुक्त बिष्णोई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी आहे. या ठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी हाताला काही ना काही काम मिळते म्हणून देशभरातील सर्व जाती-धर्माचे लोक शहरात वास्तव्याला आलेले आहेत. आता पिंपरी चिंचवड हे शहर एक महानगर म्हणून ओळखले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण देशातच महिलांच्या असुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्याला पिंपरी चिंचवड शहर सुद्धा अपवाद नाही. शहरातील महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जशी समाजाची जबाबदारी आहे, तशी ती पोलिसांचीही आहे. पोलिसांनी शहरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची आवश्यकता आहे.
परंतु, गेल्या काही महिन्यांपासून शहरात वेगळेच चित्र दिसत आहे. शहरातील गुन्हेगारी वाढीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. परिणामी येथील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागलेली आहे. शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील रोडरोमिओंचा प्रश्न गंभीर आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिस आणि महिलांचा संवाद होत असल्याचे चित्र कुठेही दिसत नाही. तसेच पोलिसांकडून महिला तसेच विद्यार्थीनींच्या सुरक्षेबाबत जनजागृती होत नाही हे सर्व गंभीर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या गंभीर घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील पोलिसांनी महिला सुरक्षेबाबत गंभीर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
नागपूर पोलिसांनी रात्रीच्या वेळी नोकरी अथवा अन्य कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांना त्यांच्या घरांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनीही अशी व्यवस्था निर्माण करावी, महिलांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शहरात जनजागृती करण्यात यावी, तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांना पोलिस ठाणे व चौकीमध्ये सन्मानाची वागणूक मिळावी तसेच शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील रोडरोमिओंना आळा घालण्यासाठी निर्माण केलेल्या पोलिस पथकांना अधिक सतर्क करण्यात यावे, अशा मागण्या महापौर माई ढोरे यांनी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांचेकडे केल्या आहेत.”